कौटुंबिक न्यायालयात दावा दाखलसाठी पक्षकार बेचैन; तर, कुठे नात्यांमध्ये सुधारणा
– विजयकुमार कुलकर्णी
पुणे – कौटुंबिक कलहामुळे घटस्फोटासाठी दावा दाखल करायचा आहे. सर्व कागदपत्रांची जुळवाजुळवी झाली आहे. मात्र, करोनामुळे अचानक लॉकडाऊन सुरू झाले आहे, असे पक्षकार कौटुंबिक न्यायालयात दावा दाखल करण्यास बेचैन झाले आहेत. दावा दाखल करण्याची प्रक्रीया लवकरात लकवर करण्याबाबत ते वकिलांकडे आग्रह धरत आहेत. मात्र, अतिमहत्त्वाचे प्रकरण सोडून ई-फायलिंगची सेवा उपलब्ध नसल्याने लॉकडाऊन संपेपर्यंत पक्षकारांना वाट पहावीच लागणार आहे. दुसरीकडे, मात्र, लॉकडाऊनमुळे काहींना नात्यांची किंमत कळली आहे. त्यामुळे त्यांच्या नात्यात सुधारणा झाली आहे.
घटस्फोटासाठी अर्ज करण्याचे प्रमाण वाढले आहे. सोशल मिडीयाचा वाढता वापर, आर्थिक अस्थिरता, वास्तवतेचे भान न ठेवता जोडीदारांकडून केलेल्या अवास्तव अपेक्षांबरोबरच, स्वयंपाक न करणे, आवडी-निवडीतील तफावत, इगो प्रॉब्लेम अशा किरकोळ कारणांमुळे निर्माण झालेले वाद कौटुंबिक न्यायालयात पोहोचत आहेत. पूर्वी पत्नीला माहेरहून पैसे आणण्यासाठी लावण्यात येणारा तगादा, सासरच्या मंडळींकडून देण्यात येणारा त्रास, नवऱ्याला असलेले दारूचे व्यसन यासारख्या कारणांनी नात्याला सुरूंग लागायचा. मात्र, आता हे चित्र बदलले आहे.
समाजात पाश्चिमात्य संस्कृतीचे अनुकरण करण्यात येत आहे. त्यामुळे समाजात बदल झाला आहे. कुटुंब कलहाची आणि नात्याला सुरूंग लागण्याची कारणे बदलली आहेत. प्रतिष्ठा, उशिरा झालेला विवाह, ऐश-आरामाच्या वस्तू नसणे अथवा खरेदीपासून मज्जाव करणे, संपत्ती कोणाच्या नावावर ठेवणे, एकमेकास पुरेसा वेळ न देऊ शकणे, अशा कारणांमुळे पती-पत्नींमध्ये वाद होत आहेत. तुला पगार आहे. “तु लढ, घटस्फोट घेतल्याने काहीही फरक पडणार नाही’, अशी शिकवण काही पालकच मुलांना देतात. मुलांना घटस्फोट घेण्यासाठी प्रवृत्त करत असल्याचे दिसून येत आहे. त्यात दोघेही करिअरच्या पाठिमागे लागले असून, करिअरपुढे त्यांना नाते गौण वाटते. त्यामुळे घटस्फोटासाठी दाखल होणाऱ्या अर्जांचे प्रमाण वाढले आहे. काहींना लॉकडाऊन होण्यापूर्वी घटस्फोटासाठी दावा दाखल करायचा होता. ते लवकर दावा दाखल करण्यास आग्रही आहेत. तर, काहींना नात्यातील फरक जाणवू लागल्याने ते पुन्हा एकत्र येत आहेत.
घटस्फोटासाठी पाच ते सहा अर्ज दाखल करायचे होते. मात्र, लॉकडाऊनमुळे ते लांबले आहेत. ते पक्षकार दावा दाखल करण्याबाबत फोन करून आग्रही आहेत. मात्र, दावा दाखल झाला, तरी त्याची सुनावणी लॉकडाऊननंतर होणार आहे. पक्षकारांनो लॉकडाऊन संपेपर्यंत घाई करू नका. कौटुंबिक कलहामध्ये समजूतदारपणा दाखवावा. अर्जन्सीची गरज नाही. एखाद्या प्रकरणात महिलेला खूपच त्रास होत असेल, तर दखल घेणार असल्याचे दस्तुरखुद्द गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले आहे. नागरिकांनी थोडासा संयम ठेवणे आवश्यक आहे. न्यायालय सुरू झाल्यानंतर सर्व प्रक्रिया सुरू होणारच आहे. सध्याच्या परिस्थितीत कायद्यापेक्षा माणुसकीचा धर्म मोठा आहे. माणुसकी धर्म जपून संयम ठेवावा.
– ऍड. सुनीता जंगम, सचिव, दी फॅमिली कोर्ट लॉयर्स असोसिएशन, पुणे