गणेश घाडगे
नेवासे – साडेसाती पाठीमागे लागल्यानंतर हे आरिष्ट्य टाळण्यासाठी अनेक जण शनिशिंगणापूर येथे शनी देवाच्या दर्शनासाठी येत असतात. मात्र आता चक्क शनिशिंगणापूर व शनीदेवाचे दर्शन भाविकांसाठी बंद केले आहे. मागील शंभर वर्षांत प्रथमच शनिदेवाचे दर्शन भाविकांसाठी बंद करण्यात आले आहे. त्यामुळे येथील अर्थकारण ठप्प झाले आहे. लॉकडाऊन उठल्यानंतर येथील व्यावसायीकांकडून शनिभक्तांची होणारी लूट थांबेल का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
करोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून शनैश्वर देवस्थानने शनी देवाचे दर्शन बंद केले आहे. मागील शंभर वर्षांतील ही पहिल्यांदाच घडलेली घटना आहे.
लाकडाऊनमुळे भाविक नसल्याने शनिशिंगणापूरची अर्थव्यवस्था कोमेजून गेली आहे. लॉकडाऊन उठल्यावर अन्य गावे व शहरे त्याच क्षणी सुरू होतील. मात्र शिंगणापूरला मात्र भाविक येण्याची वाट पाहावी लागणार आहे. शनीदेवावर भक्ती व श्रद्धा असणाऱ्यांची संख्या मोठी आहे. मात्र करोनोच्या साडेसातीतून सुखरूप बाहेर पडल्याबद्दल शनीच्या चौथऱ्यावर दर्शनासाठी हजेरी ते नक्कीच हजेरी लावणार यात शंकाच नाही. पण त्याच्यातून शिंगणापूरच्या आर्थिक उलाढालीला त्याचा किती उपयोग होईल, हे येणारा काळच ठरविलेल.
मागील 100 वर्षांच्या काळात शनी देवाचे शिंगणापूर मागील महिनाभरापासून बंद राहिल्याने येथील दुकानदार, हॉटेल मालक व अन्य व्यावसायिक व शनिभक्तांना शनी देवाचा महिमा समजला असणार. त्यामुळे येथील लटकूंनी आता तरी आपल्यातील दोष दूर करून येथे येणाऱ्यांना कोणतीही उणिवा नव्याने जाणवू देऊ, नये अशीच भक्तांची अपेक्षा असणार आहे. शिंगणापूरला येतानाच सोनईपासून तपासणी टोल नाका, यंत्र खरेदी, अभिषेक साहित्य, हार-प्रसाद खरेदी, हॉटेल, तसेच खासगी वाहनचालक व्यावसायिकांची व कमिशन एजंटांची लूट सुरू होते.
बाहेरील भाविकांना अरेरावी, ओल्या वस्त्राने करण्यात येणाऱ्या अभिषेकाची किंमत जास्त देत देखील भाविक आपल्या साडेसातीसाठी कुठेही तक्रार न करता शिंगणापूरला येताच असतात. या लॉकडाऊनच्या काळात शनिशिंगणापूर संस्थानकडून आता तरी या सर्व गोष्टींवर उपाय निघण्यासाठी विचार मंथन होईल का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
या ठिकाणी चोरी होत नाही, हा इतिहास आहे. मात्र येथील व्यावसायिकांकडून भाविकांची लूटमार होत असल्याने शनी संस्थान, ग्रामपंचायतीने यावर विचार करण्याची आवश्यकता आहे. लॉकडाऊन संपल्यावर नव्याने सुरू होणाऱ्या या शिंगणापूरमध्ये भाविकांना या सर्व साडेसातीतून सोडवण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न व्हावा, अशी नेवासेकारांची अपेक्षा आहे.