नगर – डोंगराची काळी मैना म्हणून सर्वांच्या परिचित असलेले करवंद करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे जंगलातील जाळीतच लॉकडाऊन झाले आहेत.
सध्या कोणतेही वाहन उपलब्ध नसल्याने गावागावांत व चौका-चौकांत दिसणारी करवंदाची टोपली आता पाहण्यास मिळत नाहीत. या वर्षी हा रानमेवा जंगलातच राहणार की काय? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. ग्रामीण भागातील डोंगर-दऱ्यांत असलेल्या करवंदांच्या जाळ्या बहरून आल्या आहेत. मात्र लॉकडाऊनमुळे जंगलाचा हा रानमेवा जाळीतच लॉकडाऊन झाला आहे. लॉकडाऊन संपेल आणि आपल्याला करवंद बाजारात विकता येतील, अशी आशा शेतकरी बांधवांना आहे. परंतु, लॉकडाऊनमुळे गावोगावी भरणाऱ्या जत्रा, आठवडे बाजार बंद असल्याने शेतकऱ्यांना आर्थिक हात देणारा हा व्यवसाय ठप्प आहे.
ग्रामीण भागातील डोंगररांगांमध्ये काळ्या मैनेच्या मोठमोठ्या जाळ्या आहेत. उन्हाळ्यात हा रानमेवा बहरतो. स्थानिक शेतकरी बांधव सकाळपासूनच कडकडीत उन्हाची पर्वा न करता हा रानमेवा जमा करतात. तसेच बाजारासह वाड्या-वस्त्यांवर विक्रीसाठी नेतात. लहान मुले हा रानमेवा विकून आई-वडिलांना आर्थिक हातभार लावत असतात. तसेच वह्या-पुस्तके खरेदी करतात. या व्यवसायातून काही दिवसांची रोजी-रोटी मिळते. परंतु, करोनामुळे या शेतकऱ्यांचे उत्पन्न बुडाले आहे.