भोर – लॉकडाऊन काळात सर्वच व्यवहार ठप्प झाले आहे. ना कुठे लग्नसमारंभाच्या जेवणावळी, ना पुजाअर्चा, ना स्नेहाभोजनाच्या पंक्ती, यात्रा-जत्राही नाहीत. यामुळे प्राणी-पक्ष्यांचीही भूक भागेनाशी झाली असून ते अन्न-पाण्यावाचून व्याकुळ झाल्याचे दिसत आहे.
भोर शहरातील कावळे याच कारणामुळे आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे. खायला मिळत नसल्याने कावळे लहान प्राणी, पक्ष्यांवर झडप घालत आहेत, तर अनेकदा लोकांच्या घरातही शिरत आहेत. कावळा हा पक्षी सतत माणसांच्या वर्दळीत वावरणारा आहे. अगदी गॅलरीतल्या कठड्यावर बसून शुभसंकेत देणारा हा काकपक्षी माणसाचा मित्र म्हणूनच ओळखला जातो.
तो स्वच्छतेचा दूत आहे. हिंदु धर्म संस्कृतीत एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर विधीवैकल्यावेळी कावळ्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. माणसाची आणि कावळ्याशी असलेली जवळीक इतिहास काळापासूनची असल्याचे पोथीपुराणातून सांगितली जाते. मात्र, हाच कावळा सध्या काहीसा आक्रमक झालेला पाहायला मिळत आहे.
हॉटेल, चिकन सेंटर बंद असल्याने अन्न मिळेना
सध्या लॉकडाऊनमुळे हॉटेल, चिकन-मटण सेंटर, लग्नसराईतील जेवणावळी आदी कार्यक्रम पूर्णपणे बंद आहेत, त्यामुळे पक्ष्यांना खाण्यासाठी शहरी भागात अन्न मिळत नसल्याने हे पक्षी आक्रमक होत आहेत.
मार्चनंतर कावळ्याच्या घरट्यांमध्ये अंडी आणि पिले असतात, त्यामुळे पिलांना खाद्य मिळावे याकरिता त्यांचा खटाटोप चालू आहे. लॉकडाऊनमुळे काही मिळत नसल्याने हे कावळे अन्नासाठी आक्रमक झाले असावेत.
– डॉ. प्रा. संजय देवकर , पक्षीमित्र, भोर
निर्सगाच्या चक्रात प्रत्येक जीव महत्त्वाचा घटक आहे, त्यामुळे आपणही कोणासाठी तरी आहोत हे लक्षात ठेवण्याची गरज आहे म्हणून प्रत्येकाने सध्याच्या दिवसांमध्ये प्राणी-पक्ष्यांसाठी मदतीचा हात पुढे केला पाहिजे. त्यांच्या अन्नपाण्याची सोय केली पाहीजे आणि आपली संस्कृती जोपासली पाहिजे.
– ताहीर शेख, वन-निसर्ग अभ्यासक, भोर