भोर -भोर शहरातील बाजारपेठेत रोजच गर्दी होत असून, त्यामुळे करोनाचा संसर्ग वाढत आहे. दरम्यान, प्रशासनाला ही वाढती गर्दी थांबवण्यासाठी पुन्हा एकदा लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घ्यावा लागेल, असा इशारा भोर नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉ. विजयकुमार थोरात यांनी दिला.
शहर आणि तालुक्यात रुग्णांची संख्येत झपाट्याने वाढ होत असून, याचे गांभीर्य नागरिकांना राहिलेले नाही. बाजारपेठेत रोजच तोबा गर्दी होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. प्रशासनाने 1 जुलैपासून व्यापाऱ्यांच्या मागणीनुसार लागू केलेल्या लॉकडाऊनमध्ये अटी शर्तीच्या व सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करण्याच्या अटींवर शिथिलता आणली आहे. सकाळी 9 ते दुपारी 2 या वेळेतच दुकाने चालू ठेवण्याचे आदेश असतानाही बाजारपेठेतील दुकाने सर्रास दिवसभर सुरू ठेवली जात असून प्रशासनाच्या नियमांची पर्वा न करता मनमानी सुरू आहे.
यामुळे संसर्गाचा धोका वाढत असल्याचे वास्तव समोर येत आहे, रविवार (दि. 9) पासून पावसाने उसंत घेतल्याने ग्रामीण भागातील लोक खते, बाजारहाट, औषधे, बॅंकांची कामे करण्यासाठी शहरात गर्दी करीत असल्याने बाजारपेठेत अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी होत आहे. वाहतुकीचे नियोजन करताना पोलिसांना अडचणी येत आहेत. व्यापारी नियमांचे पालन न करता दिवसभर दुकाने सुरू ठेवत आहेत, त्यामुळे भोर शहरात करोनाचा फैलाव वाढत आहे.
भोर शहरातील वाढती गर्दी आटोक्यात आणण्यासाठी शहरातील मुख्य भागांत पुन्हा बॅरिकेट्स लावण्यात येणार आहेत. मात्र, त्यानंतरही जर गर्दी नियंत्रणात आली नाही तर लॉकडॉऊनचा निर्णय घेण्यात येणार आहे.
डॉ. विजयकुमार थोरात, मुख्याधिकारी, नगरपालिका,भोर.