सातारा ( प्रतिनिधी) – सातारा नगरपालिका निवडणुकीत स्वतंत्र पॅनल टाकायचे की अन्य कोणता निर्णय घ्यायचा याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक नेते घेणार आहेत. त्यामध्ये आम्ही वरिष्ठ नेतेमंडळी कोणताही हस्तक्षेप करणार नाही. तो जे अहवाल पाठवतील, त्यावर आम्ही निर्णय घेऊ , अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष ना. जयंत पाटील यांनी सातारा येथे व्यक्त केली. दरम्यान दिल्ली येथील शेतकरी आंदोलनाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी हट्टी भूमिका घेत असल्याचा आरोपही पाटील यांनी केला.
ना. जयंत पाटील यांनी शनिवारी रात्री उशिरा सातारा येथील शासकीय विश्रामगृहात जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या निवडक पदाधिकारी व कार्यकर्त्यांची चर्चा केली. यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. आ. मकरंद पाटील व राष्ट्रवादी काँग्रेसचे सातारा जिल्हाध्यक्ष सुनील माने यांनी ना.पाटील यांचे स्वागत केले.
यावेळी सारंग पाटील, सत्यजित पाटणकर, जिल्हा सरचिटणीस राजकुमार पाटील, जिल्हा परिषद सदस्य दीपक पवार, प्रदेश सरचिटणीस अविनाश मोहिते, राष्ट्रवादी युवकचे जिल्हाध्यक्ष तेजस शिंदे, विद्यार्थी आघाडी जिल्हाध्यक्ष अतुल शिंदे, प्रदेश सरचिटणीस गोरखनाथ नलवडे, शफिक शेख, राजेंद्र लवंगारे, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
आगामी सातारा नगरपालिका निवडणुकीबाबत स्थानिक पदाधिकारी निर्णय घेणार आहेत. जे मेरीटवर आहे ते मेरीटवरच होईल. पक्षाचे सातारा येथील युनिट त्यांचा निर्णय आम्हाला कळवेल त्यानंतर त्याला परवानगी द्यायची की नाही, हा पुढचा भाग आहे. मात्र, आमचा त्यामध्ये फार काही हस्तक्षेप नसेल. साताऱ्यातील राष्ट्रवादीच्या नेत्यांनी अजून आमच्याशी काही संपर्क साधलेला नाही. त्यामुळे त्यावर आता काही बोलणे उचित ठरणार नसल्याचे पाटील म्हणाले.
दरम्यान, दिल्ली येथील शेतकरी आंदोलनाबाबत पाटील म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लक्षात त्यांची चूक आली आहे. आता त्यांना ती आणखी हळू-हळू कळून येईल. पंतप्रधानांनी त्यासाठी एवढा हट्ट करणे बरोबर नाही. त्यांनी स्वत:हून चार पावले मागे येवून शेतकऱ्यांशी चर्चा करायला हवी होती.
ना.जयंत पाटील यांनी पडळकराना फटकारले
जयंत पाटील यांनी भाजपचे आ. गोपीचंद पडळकर यांच्यावरही टीका केली. त्या पोरकटाकडे लक्ष देवू नका.प्रसारमाध्यमांनीही त्याकडे फार काही लक्ष देवून त्याला मोठे करण्यात धन्यता मानू नये, असा आग्रहही त्यांनी यावेळी केला.
मोठ्या व्यक्तींवर टीका करुन ते सर्वांचे लक्ष आपल्याकडे वेधत आहेत. यासाठी ते आक्रस्ताळपणे विधाने करत अशून कोणावर बोलताना आपली तेवढी पात्रता आहे का, हे आधी ठरवावे. स्थानिक लोकांनी निर्णय घेवून कार्यक्रमाचे नियोजन केले होते. ते तेथे जावून तो कार्यक्रम थांबवणे म्हणजे पोरकटपणा आहे. राजकारण किती खालच्या स्थराला न्यायचे हा एक नमूना आहे,’ असे म्हणत त्यांनी पडळकरांना फटकारले.