उच्च व तंत्र शिक्षण मंत्र्यांचा विश्वास
पुणे – विद्यार्थ्यांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षांसंदर्भातील विद्यार्थ्यांना केंद्रबिंदू मानून त्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही, असाच विद्यार्थीहिताचा निर्णय घेऊ, असा विश्वास उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला आहे.
सोमवारी झालेल्या व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये उच्च व तंत्र शिक्षण राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, विभागाचे सचिव सौरभ विजय, तंत्रशिक्षण संचालक डॉ. अभय वाघ तसेच सर्व कुलगुरू सहभागी होते. सामंत म्हणाले, “अंतिम सत्राच्या परीक्षेसंदर्भात काय निर्णय घ्यावा, याबद्दल राज्यपाल कोश्यारी यांच्याशी चर्चा झाली. राज्य समितीने दोन दिवसांमध्ये परीक्षेसंदर्भात तयार करून तो अहवाल राज्यपाल आणि शासनास सादर करावा, अशा सूचना बैठकीमध्ये देण्यात आल्या.’
सामंत म्हणाले…
शिक्षणाच्या आंतरराष्ट्रीय दर्जावर परीक्षा आणि गुणांचा काही परिणाम होणार नाही, याची दक्षता घेणार.
विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा आणि मानसिक स्थितीचा पूर्णपणे विचार करून वस्तुस्थितीचा अंदाज घेणार
महाविद्यालये, विद्यापीठाच्या इमारती, वसतिगृह क्वारंटाइनसाठी दिली आहेत. या इमारती कधी खुल्या होतील, हे आत्ताच सांगणे कठीण आहे. अशा स्थितीत परीक्षा घेणे कितपत शक्य होईल, यावर विचार सुरू आहे.