निवारा केंद्रातील नागरिकांचा अन्नत्याग : गावी पाठविण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू
पिंपरी – करोनाचा फैलाव वाढू लागल्याने राज्यातील व परप्रांतीय काही मजुरांना पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवारा केंद्रात ठेवण्यात आले होते. परंतु, तब्बल दीड महिना निवारा केंद्रात राहिलेले नागरिक आता जेरीस आले आहेत.
पिंपरी कॅम्पातील एका केंद्रात असलेल्या 21 नागरिकांनी घरी जाण्यासाठी अन्नत्याग केल्याने एकच खळबळ उडाली. आम्हाला घरी जाऊ द्या, अन्यथा उपाशी मरू द्या, असा पवित्रा त्यांनी घेतल्यामुळे अखेर पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाने त्यांना गावी पोहचविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसद्वारे त्यांना सोडण्याचा प्रयत्न सुरू केल्याचे पालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात करोना विषाणूचा फैलाव वाढू लागला. तसेच, नंतर देशभरात लॉकडाऊन वाढला असून आता 17 मे पर्यंत सर्वत्र लॉकडाऊन जारी करण्यात आला आहे. परंतु, सध्या परराज्यातील व महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील नागरिकांना घरी जाण्यास परवानगी दिली जात आहे. त्यासोबत अनेक घर नसलेली व राहण्याची कोणताही व्यवस्था नसलेल्या 395 नागरिकांना आतापर्यंत महापालिकेच्या निवारा केंद्रात ठेवले होते. त्यापैकी 171 जणांना आतापर्यंत त्यांच्या घरी पोहचविण्यात आले असून 224 जण अजूनही निवारा केंद्रात आहेत. दरम्यान, पिंपरी कॅम्पातील एका निवारा केंद्रात मध्यप्रदेशातील 17 आणि महाराष्ट्रातील चार असे 21 जण आहेत.
दीड महिन्यापासून निवारा केंद्रात राहणाऱ्या या नागरिकांनी घरी जाण्यासाठी आज अचानक आक्रमक पवित्रा घेत अन्नत्याग करण्याचा निर्णय घेतला. आम्हाला काहीही करून घरी जाऊ द्या, अन्यथा अन्नत्याग करून आम्ही अन्नावाचून उपाशी मरू, अशी भूमिका त्यांनी घेतली. यानंतर पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या नागरिकांशी संवाद साधत घरी जाण्याबाबत महापालिका सकारात्मक भूमिका घेईल असे सांगत समजूत काढली. तसेच त्यांची नावे जिल्हाधिकारी कार्यालयाला पाठविली. मात्र त्यावर अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही.
अन्नत्यागाची भूमिका या नागरिकांनी घेतल्याने अखेर त्यांच्यासाठी मार्ग काढण्यास सुरुवात करण्यात आली आहे. मध्यप्रदेशातील नागरिकांना त्यांच्या सीमेपर्यंत राज्य परिवहन महामंडाळाच्या एसटीच्या मदतीने सोडण्याचा प्रयत्न सुरू करण्यात आला आहे.
सद्यस्थितीत पिंपरी-चिंचवड शहरात 224 नागरिक शहरातील विविध निवारा केंद्रात आहेत. पिंपरी केंद्रातील नागरिकांनी जेवण न करण्याची भूमिका घेतली होती. त्यांची समजूत काढण्यात आली असून त्यांना घरी पोहचविण्यासाठी पालिकेने प्रयत्न सुरू केले आहेत. इतर प्रशासकीय यंत्रणांशी चर्चा सुरू आहे. एसटी किंवा रेल्वेव्दारे त्यांना त्यांच्या घरी पाठविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.
– मनोज लोणकर, सहायक आयुक्त, पिंपरी-चिंचवड महापालिका