Less Oil Cooking Tips: भारतीय स्वयंपाकात तेलाला खूप महत्त्व आहे. भाजी, पोळी, पराठे, तळलेले पदार्थ किंवा सणावाराचे खास पदार्थ बहुतांश पदार्थांमध्ये तेलाचा वापर होतोच. मात्र जास्त तेल खाल्ल्यामुळे वजन वाढणे, पचनाच्या समस्या आणि हृदयविकाराचा धोका वाढू शकतो. त्यामुळे आता कमी तेलात चविष्ट आणि पौष्टिक स्वयंपाक करण्यावर भर दिला जात आहे. (Less Oil Cooking Tips) अलीकडेच नरेंद्र मोदी यांनीही लोकांना खाद्यतेलाचा वापर १० टक्क्यांनी कमी करण्याचे आवाहन केले आहे. यामुळे आरोग्य सुधारण्यास मदत होईलच, शिवाय आर्थिक बचतही होऊ शकते. काही सोप्या किचन टिप्स वापरून कमी तेलातही उत्तम चवीचे पदार्थ बनवता येऊ शकतात. कमी तेलात स्वयंपाक करण्यासाठी योग्य भांडी निवडणे खूप महत्त्वाचे आहे. कास्ट आयर्न, नॉन-स्टिक किंवा सिरॅमिक कोटिंग असलेली भांडी वापरल्यास पदार्थ भांड्याला चिकटत नाहीत. त्यामुळे कमी तेलातही स्वयंपाक सहज होतो. लोखंडी भांड्यांमध्ये बनवलेले अन्न शरीरातील आयर्न वाढवण्यासही मदत करते. डीप फ्राय करण्याऐवजी पदार्थ भाजून किंवा स्टीम करून खाणे हा उत्तम पर्याय ठरू शकतो. वांगं, बटाटा, टोमॅटो किंवा दोडका भाजून त्यापासून भरीत किंवा चोखा तयार करता येतो. अशा पदार्थांना कमी तेल लागते आणि त्यांना छान स्मोकी फ्लेवरही मिळतो. घोसाळे, भोपळा किंवा दुधी भोपळ्यासारख्या भाज्या फक्त एक चमचा तेलातही चविष्ट बनू शकतात. (Less Oil Cooking Tips) less oil cooking स्वयंपाक करताना तेल ओतण्याची पद्धत बदलणेही फायदेशीर ठरू शकते. अनेकजण थेट बाटलीतून तेल कढईत टाकतात, त्यामुळे नकळत जास्त तेल वापरले जाते. त्याऐवजी छोटा चमचा किंवा किचन ब्रश वापरल्यास तेलाचे प्रमाण नियंत्रणात राहते. (Less Oil Cooking Tips) ग्रेव्ही बनवताना टोमॅटोऐवजी दही वापरण्याचाही सल्ला दिला जातो. टोमॅटो परतण्यासाठी जास्त तेल लागते, पण दह्यामध्ये नैसर्गिक फॅट असल्यामुळे कमी तेलातही छान ग्रेव्ही तयार होते. त्यामुळे पदार्थ अधिक हलके आणि पचायला सोपे होतात. कमी तेलातही पदार्थ चविष्ट बनवण्यासाठी काही नैसर्गिक घटक मदतीला येतात. शेंगदाणे किंवा नारळ वाटून भाजीत घातल्यास चांगला टेक्स्चर आणि चव मिळते. काश्मीरी मिरची, लसूण, तमालपत्र, जावित्री आणि कसुरी मेथी यांसारखे मसाले वापरल्यास पदार्थ सुगंधी आणि स्वादिष्ट बनतात. आरोग्यदायी जीवनशैलीसाठी तेलाचे प्रमाण कमी ठेवणे गरजेचे आहे. थोड्या सवयी बदलल्या तर कमी तेलातही पौष्टिक, चविष्ट आणि हलके अन्न सहज तयार करता येते. त्यामुळे आरोग्य आणि चव यांचा उत्तम समतोल साधता येऊ शकतो.