प्रभात वृत्तसेवा मंचर – आंबेगाव तालुक्यातील डोंगरदऱ्यांमध्ये आणि शिवार भागात बिबट्यांचा वाढता उपद्रव सुरू असतानाच या भीतीत सर्वाधिक त्रस्त झालेले आहेत ते मेंढपाळ. रोजच्या रोज रानोमाळ फिरत मेंढ्या–बकऱ्यांचा सांभाळ करणाऱ्या या मेंढपाळांचे जीवन आता अक्षरशः भीतीच्या सावटाखाली गेले आहे.बिबट्याच्या भीतीत मेंढपाळांचे जगणे कठीण झाले असून कुत्रेच बनले रात्रपाळीचे रखवालदार.यामुळे कुत्र्यांच्या रखवालदारीवरच मेंढपाळांचा संसार चालला आहे. मेंढपाळ आपल्या पशुधनासह दिवसभर चाऱ्याच्या शोधात ते डोंगरकड्यावर, जंगलाच्या काठावर भटकतात आणि संध्याकाळी उघड्या शेतातच मुक्काम करतात.मात्र रात्री बिबट्याच्या भीतीमुळे डोळ्यांवर झोप येत नाही.अंधारात प्रत्येक आवाज,प्रत्येक सळसळ त्यांच्या मनात भीती निर्माण करते.“घरात आणि दारात माणसं सुरक्षित नाहीत, मग आमचं आयुष्य म्हणजे रोजचा जिवंत संघर्षच,” असे म्हणत ते त्यांच्या भीतीचा आणि जगण्याचा संघर्ष व्यक्त करतात. मेंढपाळांच्या मते, त्यांची खरी सुरक्षा त्यांच्या पाळीव कुत्र्यांवरच अवलंबून आहे. “आमची कुत्री म्हणजे आमचा श्वास,” असे ते म्हणतात. कुत्रे रात्री जागे राहतात, भुंकून इशारा देतात आणि त्यामुळे बिबट्याच्या हालचाली कळतात.कुत्र्याच्या एका भुंकण्यावरच मेंढपाळ जागे होतात, हातात काठी घेऊन शेळ्या–मेंढ्यांच्या बचावासाठी उभे राहतात.अनेक वेळा आम्ही काही फुटावर बिबट्याला अगदी काही अंतरावर पाहिल्याचे सांगितले असून, तरीही धैर्याने रोज आपले जगणे सुरू ठेवतात. बिबट्याच्या दहशतीने भरलेल्या या काळात त्यांच्या अंगावर येणारे प्रसंग अंगावर शहारे आणणारे आहेत.असे ते सांगतात. “आमचं जगणं म्हणजे मृत्यूच्या सावलीतले दिवस. रात्री बिबट्याची चाहूल लागली की कुत्रं भुंकतं आणि आम्ही थरथरत जागे होतो.कुत्रं आमचं रक्षण करतं, म्हणूनच आम्ही जिवंत आहोत.” -शांताबाई विठ्ठल वाळुंज,मेंढपाळ, पोंदेवाडी.