जांबुत : शिरूरच्या बेट भागात मागील महिनाभरात बिबट्याने हौदोस माजवला आहे. जांबूत आणि पिंपरखेड परिसरात बिबट्याच्या हल्ल्यात महिनाभरात तीन जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. या हल्ल्यांपैकी दोन हल्ले हे दिवसाढवळ्या झाल्याने नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली असून शिरूर, आंबेगाव, जुन्नर, खेड तालुक्यासह जवळपास राज्यातील अनेक भागात बिबट्याच्या भीतीचे सावट निर्माण झाले आहे. मागील पंधरा दिवसांपूर्वी जांबूत (ता. शिरूर) येथील एका पतसंस्थेमध्ये कार्यरत असलेले दोन कर्मचारी वसुली करण्यासाठी बाहेर पडले असता त्यांचेवर बिबट्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याने कर्मचारी वर्गात घबराट निर्माण झाली आहे. दरम्यान, बिबट प्रवण क्षेत्रातील बँका, पतसंस्थांसह इतर सहकारी संस्था व खाजगी शाळांच्या वेळेत बदल करण्याची मागणी कर्मचारी वर्गातून होत आहे. सकाळी दहा ते पाच या वेळेत सर्व दैनदिन कामकाज झाल्यास दूरवरून येणारे विद्यार्थी, अधिकारी ,कर्मचारी व शिक्षक आदींना वेळेवर घरी येणे सोयीचे ठरणार असून ज्या ज्या कार्यालयांच्या वेळा या उशिरापर्यंत आहेत. त्या त्या कार्यालय, बँकांनी आपल्या वेळेत बदल करण्याची मागणी होत असून बिबट समस्यांच्या पार्श्वभूमीवर काही कालावधीसाठी हे बदल होणे गरजेचे असल्याचे बोलले जात आहे. शासनाच्या आदेशानुसार वनविभाग मात्र अॅक्शन मोडवर आला आहे. मागील वीस दिवसांत एका बिबट्याला ठार करून जवळपास १२ बिबट जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले आहे. मात्र, या भागातील बिबट्यांची व हल्ल्यांची संख्या पाहता नागरिकांमध्ये भीतीचे सावट कायम असल्याचे दिसून येते. या घटनांचे गांभीर्य लक्षात घेता राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, वनमंत्री गणेश नाईक, माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, म्हाडाचे अध्यक्ष शिवाजीराव आढळराव पाटील, खासदार अमोल कोल्हे, माजी आमदार पोपटराव गावडे, बाळासाहेब बेंडे, देवदत्त निकम, सुरेश भोर, अशा बुचके यांचेसह अनेक नेतेमंडळीनी घटनास्थळांना भेटी देत विविध उपाययोजना बाबत वनप्रशासनाला सूचना दिल्या. वनविभाग आता कारवाई करण्यासाठी सरसावला आहे.