प्रभात वृत्तसेवा तळेगाव ढमढेरे – दहिवडी (ता. शिरूर) गाव आणि परिसर गेल्या काही वर्षांपासून बिबटप्रवण क्षेत्र म्हणून ओळखला जात असून, अलीकडील काळात येथे बिबट्यांचा वावर लक्षणीयरीत्या वाढला आहे. गावाच्या हद्दीत तसेच शेतशिवारात मोठ्या प्रमाणावर ऊस लागवड असल्याने बिबट्यांना लपण्यासाठी अनुकूल वातावरण मिळत आहे. परिणामी गावातील नागरिक, शेतकरी, पशुपालक तसेच शाळकरी विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.गेल्या काही महिन्यांत दहिवडी येथे बिबट्यांकडून पाळीव प्राण्यांवर वारंवार हल्ले झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. या हल्ल्यांमध्ये अनेक शेळ्या, मेंढ्या, पाळीव कुत्रे, वासरे तसेच एका घोड्याचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. ज्यामुळे शेतकरी व पशुपालकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.शेतात नियमितपणे काम करणारे शेतकरी सध्या जीव मुठीत धरून काम करत आहेत. विशेषतः पहाटेच्या आणि संध्याकाळच्या वेळेत बिबट्याचे दर्शन होण्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. शाळकरी मुलांनाही बिबट्यांचे दर्शन झाल्याने पालकांमध्ये मोठी चिंता निर्माण झाली आहे. या गंभीर परिस्थितीची दखल घेऊन दहिवडी ग्रामस्थांनी वनविभाग व स्थानिक प्रशासनाकडे ठोस उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. याबाबतचे निवेदन पोलीस पाटील जालिंदर पवार आणि ग्रामस्थ अंकुश ढमढेरे यांच्या माध्यमातून वनविभागाला देण्यात आले आहे. ग्रामस्थांनी विशेषतः कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित ‘बीस्ट अलर्ट सिस्टीम’ गावात व शेत परिसरात बसविण्याची मागणी केली आहे. या प्रणालीमुळे बिबट्यांच्या हालचाली त्वरित ओळखून तत्काळ इशारा देता येईल, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.