प्रभात वृत्तसेवा ओतूर – उंब्रज पांध परिसरात वन विभागाने लावलेल्या पिंजऱ्यात रविवारी (दि. २८) पहाटे साडेपाचच्या सुमारास एक बिबट मादी जेरबंद झाली आहे. या तिचे वय अंदाजे चार ते पाच वर्षे असून, तिला पकडल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून भीतीखाली असलेल्या स्थानिक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी चैतन्य कांबळे यांनी दिली आहे. काही दिवसांपूर्वी या परिसरात बिबट्याचा वावर वाढल्याने वन विभागाने येथे पिंजरा लावला होता. रविवारी पहाटे बिबट्या पिंजऱ्यात अडकल्याची माहिती मिळताच, वनपरिक्षेत्र अधिकारी चैतन्य कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल सारिका बुट्टे, वनरक्षक विश्वनाथ बेले, किसन खरोडे, किसन केदार, गणपत केदार, रोहित लांडे आणि प्रदीप तांबे यांनी घटनास्थळी धाव घेतली. जेरबंद केलेल्या बिबट्याला सुरक्षितपणे ताब्यात घेऊन पुढील तपासणीसाठी माणिकडोह येथील बिबट निवारा केंद्रात दाखल करण्यात आले आहे.या मोहिमेदरम्यान स्थानिक शेतकऱ्यांनी वन विभागाला मोलाचे सहकार्य केले. ओतूर आणि आसपासच्या परिसरात बिबट्यांचा वावर सातत्याने दिसून येत असल्याने नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच वन्य प्राण्यांशी संबंधित कोणतीही समस्या किंवा आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास तात्काळ वन विभागाशी संपर्क साधावा, असे चैतन्य कांबळे यांनी कळवले आहे.