प्रभात वृत्तसेवा जांबूत – शिरूर तालुक्यातील बेटभागात बिबट्याची दहशत कमी करण्यासाठी वनविभागाने सुरू केलेल्या मोहिमेला सोमवारी (दि. २९) पहाटे मोठे यश आले आहे. फाकटे आणि चांडोह या दोन वेगवेगळ्या ठिकाणी लावलेल्या पिंजऱ्यात दोन मादी बिबट्या जेरबंद झाल्या आहेत. या कारवाईमुळे स्थानिक नागरिकांना तात्पुरता दिलासा मिळाला असला, तरी परिसरात अजूनही इतर बिबट्यांचा वावर असल्याने भीतीचे वातावरण कायम आहे. पिंपरखेड बीटमध्ये बिबट्यांच्या हल्ल्यात मृत्यूच्या घटना घडल्यानंतर प्रशासनाने राबवलेल्या मोहिमेत आजवर एकूण २९ बिबट्यांना जेरबंद करण्यात आले आहे.फाकटे येथे गेल्या अनेक दिवसांपासून बिबट्याचा मुक्त संचार सुरू होता. स्थानिक शेतकरी सुनील घारे यांनी पोपट फिरोदिया यांच्या शेतात बिबट्या असल्याचे निदर्शनास आणून दिल्यानंतर वनपरिक्षेत्र अधिकारी नीलकंठ गव्हाणे व वनरक्षक लहू केसकर यांच्याशी संपर्क साधून पिंजरा लावण्याची मागणी केली होती. वनविभागाने तत्परता दाखवत लावलेल्या पिंजऱ्यात सोमवारी पहाटे ६ वर्षे वयाची मादी बिबट्या अडकली. दुसरीकडे, चांडोह येथील भाऊ मारुती पानमंद यांच्या शेतात लावलेल्या पिंजऱ्यातही सोमवारी पहाटे ४ वर्षे वयाची मादी बिबट्या जेरबंद झाली.वनरक्षक लहू केसकर यांच्या मार्गदर्शनाखाली रेस्क्यू टीमचे महेंद्र दाते आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या मोहिमेत महत्त्वाची भूमिका बजावली. दोन्ही बिबट्यांना सुरक्षितपणे ताब्यात घेऊन माणिकडोह येथील बिबट निवारा केंद्रात दाखल करण्यात आले असल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी नीलकंठ गव्हाणे यांनी दिली. दरम्यान, परिसरात अजूनही काही बिबटे फिरत असल्याचे वारंवार दिसून येत असल्याने, वनविभागाने पिंजऱ्यांची संख्या वाढवून कायमस्वरूपी बंदोबस्त करावा, अशी मागणी बेट भागातील नागरिकांकडून केली जात आहे.