प्रभात वृत्तसेवा भुईंज : वाई तालुक्यातील देगाव, शिरगाव, तर कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागातील सर्कलवाडी, राऊतवाडी, अनपटवाडी या गावांमध्ये डोंगराचा भाग मध्यभागी असल्याने दोन्ही बाजूचे शेतकरी आपापली जनावरे चारण्यासाठी डोंगर माथ्यावर सोडतात. दरम्यान सर्कलवाडी भागातील काही शेतकरी गुरांना चारण्यासाठी गेले असता, बिबट्याने गाईच्या वासरावर हल्ला केल्याची घटना नुकतीच घडली असून या हल्ल्यात वासराचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे गावात आणि परिसरात एकच खळबळ उडाली आहे.याबाबत सविस्तर माहिती अशी, सर्कलवाडी येथील शेतकरी नेहमीप्रमाणे डोंगरमाथ्यावर जनावरे चारण्यासाठी गेले होते. याच दरम्यान एका वासरावर बिबट्याने अचानक हल्ला चढवल्याने या हल्ल्यात वासराचा जागीच मृत्यू झाला. यामुळे शेतकरी व ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेमुळे शेतकरी जनावरे बांधून ठेवत आहेत. महिला मजूर, शेतकरी शेताला पाणी देण्यासाठी सुद्धा जाणे टाळत आहेत. शेतकर्यांचा व जनावरांचा जीव घेणारा हा नरभक्षक बिबट्या आता गावाच्या वेशीवर आल्याने परिसरातील गावांमध्ये भीतीची सावट अधिकच गडद झाले आहे.वाई तालुक्याच्या पूर्व भागातील देगाव, शिरगाव व कोरेगाव तालुक्यातील उत्तर भागातील सर्कलवाडी, अनपटवाडी, राऊतवाडी यांना असणारा डोंगरमाथा या एकमेकांच्या शिवधड्या आहेत. येथील लोकांचा मुख्य व्यवसाय शेतीसह पशुपालन आहे. त्यामुळे गावातील गुराखी आपल्या जनावरांना चारण्यासाठी घेऊन वनक्षेत्रात जातात. या वनपरिक्षेत्रात बिबट्याने गाईच्या वासराची शिकार केल्याने या भागातील पशूपालक चिंताग्रस्त झाले आहेत. या घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी वन विभागाला तात्काळ बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे. या वनपरिक्षेत्रात बिबट्या आढळल्यानंतर वनविभागाने या गावांमध्ये शेतकर्यांना व गावकर्यांना विशेष म्हणजे गावातील अनेकांना रात्रीच्या वेळी शेतात जाणे टाळण्यास सांगितले आहे. वनविभागाचे काळजी घेण्याचे आवाहन डोंगरांमध्ये बिबट्याचा वावर दिसून आलेला आहे. तरी सर्व शेतकरी वर्ग व ग्रामस्थांनी दक्षता घ्यावी. तसेच बिबट्या कुठे दिसून आल्यास वनविभागीय अध्यक्ष अमोल काटकर यांच्याशी संपर्क साधावा व सर्वांनी सावधानगी बाळगावी व काळजी घ्यावी असे आवाहन वनविभाग अधिकारी अमोल काटकर यांनी केले आहे. “गेल्या पंचवीस वर्षापासून माझा शेळीपालन व्यवसाय असून आम्हाला डोंगरमाथ्यावरच शेळ्यांना चारा चारण्यासाठी घेऊन जावे लागते. या अगोदर सुद्धा बिबट्याची दहशत आम्ही दोन वर्षांपूर्वी पाहिली आहे. आमच्या सुद्धा शेळ्या या बिबट्याने भक्ष्य केलेल्या आहेत. वन विभाग याकडे पूर्णतः दुर्लक्ष करत आहे. आता आम्हाला शेळ्या डोंगर माथ्यावर नेणे सुद्धा जिकरीचे झाले असून बिबट्याच्या दहशतीखाली आम्ही शेळ्या कशाबशा चारत आहे.” – शेतकरी गणपत सोनवलकर.