प्रभात वृत्तसेवा पारगाव शिंगवे – गोठ्यात बांधलेल्या गायांवर हल्ला करण्याच्या तयारीत असलेल्या बिबट्याने लघुशंकेसाठी बसलेल्या महिलेवर हल्ला केला. या महिलेच्या अंगात जर्किंन असल्यामुळे महिला सुदैवाने वाचली. ही घटना बुधवारी, दि.५ रोजी पारगाव (ता.आंबेगाव) येथील चिचगाई मळा येथे साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडली. यामुळे या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.अश्विनी शिवाजी ढोबळे (वय 28), असे बिबट्याच्या हल्ल्यातून सुदैवाने वाचलेल्या महिलेचे नाव आहे. वृत्त कळताच वनविभागाने बिबट्याला जेरबंद करण्यासाठी घटनास्थळापासून काही अंतरावर पिंजरा लावला आहे.याबाबत सविस्तर माहिती अशी की पारगाव येथील चिचगाई वस्ती येथे शिवाजी शिवाजी देवराम ढोबळे यांचे घर असून घराच्या बाजूला गाईचा गोठा आहे. या गोठ्यात गाई बांधलेल्या होत्या. रात्री साडेआठ वाजता सुमारास अश्विनी ढोबळे या लघुशंकेसाठी गोठ्याच्या बाजूला आल्या. यावेळी दबा धरून बसलेल्या बिबट्या हा गोठ्यातील गायींवर हल्ला करण्याच्या तयारीत असताना गायींचा मोठ्याने हंबारण्याचा आवाज आला व अश्विनी या गोठ्याच्या बाजूला कसला आवाज येत आहे. म्हणून वळून पाहत असता लहान वासरू त्यांच्या जवळ बाजूला पडले व बिबट्याने अश्विनीवर हल्ला केला या हल्ल्यात अश्विनीच्या अंगात जर्किन असल्यामुळे त्या वाचल्या. त्यांनी हाताने हिसका दिल्यामुळे व प्रतिकार करून आरडाओरड केल्यामुळे बिबट्या उसाच्या शेतात पळून गेला. या बिबट्याच्या भीतीने अश्विनी ढोबळे या बेशुद्ध पडल्या होत्या. त्यांना दवाखान्यात नेण्यात आले. दोन तासाने त्या शुद्धीवर आल्या. तालुक्याच्या पूर्व भागातील अनेक गावांमध्ये सध्या विघ्नहर कारखाना व भीमाशंकर कारखान्याची शेतकऱ्यांच्या शेतांमध्ये ऊस तोडणी सुरू आहे. बिबट्या भक्ष्याच्या शोधात लोक वस्तीवर येऊ लागला आहे. त्यामुळे नागरिकांना हे बिबटे रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणात दिसत आहेत. माणसावर हल्ल्याच्या घटना घडत असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. शेतातील मशागतीची कामे व पिकांना पाणी देण्यासाठी विद्युत पंप सुरू करण्यासाठी रात्री अपरात्री नदीकाठी जावे लागत आहे. बिबट्याच्या भीतीने शेती कशी करावी, असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे निर्माण झाला आहे.