प्रभात वृत्तसेवा भोर – भाटघर धरणाच्या उत्तर बाजूस असलेल्या कुरुंजी (ता. भोर) येथील धनगर वस्तीजवळ बिबट्याने एका वासरावर हल्ला केला. या हल्ल्यात वासरू मृत झाले. त्यानंतर अर्ध्या तासात मृत वासरा जवळून काही अंतरावर शेतकरी उभे असतानाही बिबट्याने वासराला घेऊन जंगलामध्ये धूम ठोकली.कुरुंजी येथील धनगर वस्तीवरील शेतकरी तुकाराम धोंडीबा कचरे हे जनावरे चारण्यासाठी माळरानावर गेले होते. दिवसभर जनावरे चारून सायंकाळी सहा वाजता घरी परतत असताना बिबट्याने पाठीमागून येऊन वासरावर हल्ला केला. यावेळी गाईने वासराला वाचवण्याचा प्रयत्न केला असता बिबट्याने गाईलाही जखमी केले. यादरम्यान शेतकरी कचरे यांनी गाईला व वासराला वाचवण्याचा प्रयत्न केला. परंतु बिबट्याने कचरे यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न केला असता, कचरे यांनीही तेथून पलायन केले. या हल्ल्यात वासरू मृत झाले. तर गाय जखमी आहे. कुरुंजी गावच्या सरपंच सखुबाई नलावडे यांनी वनविभागातील अधिकाऱ्यांशी संपर्क साधून नुकसाण भरपाईची मागणी केली. यावेळी भोर तालुका भाटघर धरणग्रस्त सेवा समितीचे अध्यक्ष व माजी सरपंच विठ्ठल वरखडे, ग्रामपंचायत सदस्य दत्ता कचरे, सामाजिक कार्यकर्ते शरद कचरे, विठ्ठल कचरे यांनी घटनास्थळी येऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्याची चौकशी केली.