नवी दिल्ली – विरोधी आघाडीवर घणाघाती हल्ला करताना, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी म्हटले आहे की इंडिया आघाडीच्या गटातील पक्ष देशाला पुढे नेण्यासाठी नव्हे तर केवळ त्यांच्या स्वताच्या कुटुंबियांना पुढे नेण्यासाठी एकत्र आले आहेत.
गाझियाबादच्या कृष्णा अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘मेरी माती, मेरा देश’ कार्यक्रमाला संबोधित करताना नड्डा म्हणाले, “काल मुंबईत जमलेल्यांना तुम्ही पाहिलं का? हे असे नेते आहेत ज्यांना देशाला नव्हे, तर आपल्या कुटुंबाला पुढे न्यायचे आहे. सोनिया -जी यांना त्यांचा मुलगा राहुल-जी आणि लालू-जी याना त्यांचा मुलगा तेजस्वी यादव यांच्या राजकीय भविष्याची चिंता आहे. तृणमूल कॉंग्रेसही बंगालच्या प्रगतीसाठी काम करत नसून केवळ ‘भतिजा’ (मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे पुतणे, अभिषेक बॅनर्जी) यांच्या हितासाठी काम करत आहे”.
‘मेरी माती, मेरा देश’ मोहिमेवर बोलताना भाजप अध्यक्ष म्हणाले, “मेरी माती, मेरा देश’ ही देशवासीयांची हाक आहे. आम्ही ‘अमृत काल’मध्ये आहोत आणि ही मोहीम आम्हाला हा काळ साकार करण्यास मदत करेल. भारताला विकसित देश बनवण्याची आमची वचनबद्धता आहे. आमच्या सरकारने प्रत्येक शहिदांच्या घरातील माती आणि तांदूळाचे धान्य, देशाच्या विविध भागातून संकलीत करण्याचे ठरवले आहे. असे 8,000 कलश लखनौला पोहोचतील. जिथे त्यांचे स्वागत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते होणार आहे. ऑक्टोबरच्या अखेरीस ते कलश दिल्लीतील कर्तव्यपथावर नेले जातील. पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या वीरांच्या सन्मानार्थ विकसित केलेल्या अमृत वाटिकेत या कलशातील माती टाकतील.हा केवळ एक कार्यक्रम नसून देशाच्या भविष्याशी स्वतःला जोडण्याचे माध्यम आहे असे ते म्हणाले.
नड्डा म्हणाले की, “गेल्या 9 वर्षात आम्ही केलेल्या कामामुळे भारत जगातील पाचव्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला आहे. ऑटोमोबाईल उद्योगाचा विचार केला तर आम्ही जपानच्या पुढे आहोत.