देशातील सर्वांत जुना राजकीय पक्ष असणाऱ्या कॉंग्रेससाठी आगामी राजकीय प्रवास खडतर असल्याची कबुली या पक्षाच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी दिली आहे. कॉंग्रेस संसदीय पक्षाच्या बैठकीत बोलताना सोनिया गांधी यांनी ही कबुली देताना देशाशी निगडित अनेक गोष्टींना स्पर्श केला आहे; पण सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे राज्यातील विधानसभा निवडणुकीमध्ये कॉंग्रेसच्या दारुण पराभवानंतर प्रथमच अशा प्रकारची बैठक झाली आहे. त्यामध्ये हंगामी पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांनी खासदारांना संबोधित केले. मुळात पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून महिना होत आल्यानंतर अशा प्रकारची बैठक झाली आहे हे सुद्धा विशेष मानावे लागेल. अर्थात, ही संसदीय पक्षाची बैठक होती. यापूर्वी विधानसभा निवडणुकांच्या निकालांचे विश्लेषण करण्यासाठी पक्षाच्या काही अनौपचारिक बैठका झाल्या असल्या तरी या प्रकारे औपचारिक बैठकीत चर्चा होणे महत्त्वाचे होते.
बैठकीत अपेक्षेप्रमाणे सोनिया गांधी यांनी सर्वांनाच खडेबोल सुनावून कॉंग्रेस पक्षासाठी आगामी कालावधी अतिशय खडतर असल्याची वास्तव जाणीव करून दिली, ते बरे झाले. ज्यावेळी ही बैठक होत होती तेव्हाच सोनिया गांधी यांचे दिवंगत निष्ठावंत सहकारी अहमद पटेल यांचे पुत्र फैजल पटेल यांनी “आता मला वाट बघण्याचा कंटाळा आला असून माझ्यासाठी इतर पर्याय उपलब्ध आहेत’, अशा प्रकारची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ज्या अहमद पटेल यांनी आयुष्यभर सोनिया गांधी यांच्या बाजूला उभे राहून प्रत्येक वेळी त्यांची आणि पक्षाची समर्थपणे भूमिका सांभाळली, त्याच अहमद पटेल यांच्या मुलाला अद्यापही कॉंग्रेस पक्षांमध्ये काही महत्त्वाचे स्थान देण्यात आलेले नाही किंवा त्यांची दखल घेण्यात आलेली नाही, ही गोष्ट त्रासदायक असल्याने फैजल पटेल यांनी अशाप्रकारची तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. सोनिया गांधी यांनी एकीकडे कॉंग्रेस पक्षाचा प्रवास खडतर असल्याची भावना व्यक्त केली असतानाच कॉंग्रेस पक्षाचा हा प्रवास सुलभ व्हायचा असेल,
तर पक्षांमधील निर्णय प्रक्रिया वेगवान होण्याची गरज आहे. काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनीही पक्षाचे नेते राहुल गांधी किंवा प्रियंका गांधी यांच्याशी तीन-चार वर्षांमध्ये कोणताही संवाद झाला नसल्याची कबुली दिली होती. “आता तरुणांच्या हातात पक्ष देण्यात आल्याने आमच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांना कोणी विचारत नाही’, अशा प्रकारची अप्रत्यक्ष भावना सुशीलकुमार शिंदे यांनी एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केली होती. महाराष्ट्रसारख्या राज्यामध्ये कॉंग्रेस महाविकास आघाडीचा घटक पक्ष असला तरी यामध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस यांच्या तुलनेने कॉंग्रेसला कमी महत्त्व मिळत आहे, हे उघड आहे आणि त्याची नाराजीही कॉंग्रेसच्या काही आमदारांनी सोनिया गांधी यांच्याकडे व्यक्त केली असण्याची शक्यता आहे.
ही सर्व परिस्थिती असल्याने आणि अनेक राज्यांमध्ये कॉंग्रेसचे अस्तित्व अतिशय प्रभावहीन झाले असल्याने कॉंग्रेसला आगामी प्रवास हा खडतर असल्याची सोनिया गांधी यांनी दिलेली कबुली चुकीची म्हणता येणार नाही. पण हा प्रवास सुलभ आणि प्रभावशाली कसा करता येईल हेसुद्धा कॉंग्रेस पक्ष स्वतःच ठरवू शकतो. सोनिया गांधी यांनी म्हटल्याप्रमाणे कॉंग्रेस पक्षाचे पुनरूजीवन फक्त कॉंग्रेस पक्षासाठी नाही, तर देशासाठी महत्त्वाचे असल्याने कॉंग्रेस पक्षाने संपूर्ण मरगळ झटकून पुन्हा एकदा उभारी घेण्याची गरज आहे. प्रवास खडतर असल्याची कबुली दिली असली, तरी या खडतर प्रवासातील अडथळे बाजूला करून लक्ष्यापर्यंत पोहोचण्याचे ध्येय कॉंग्रेस पक्षाला
स्वतःलाच पूर्ण करावे लागणार आहे आणि त्यासाठी अडथळे कोणते आहेत त्याचा शोध सर्वात प्रथम घ्यावा लागणार आहे.
या मार्गामध्ये जर काही स्पीड ब्रेकर असतील किंवा काही घातक वळणे असतील तर ते दूर करण्याचे कामही कॉंग्रेस पक्षाला स्वतःलाच करावे लागणार आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे 2014 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपचे सरकार केंद्रात प्रस्थापित झाल्यापासून भाजपाची पक्षसंघटना अतिशय आक्रमक आणि प्रभावशाली पद्धतीने काम करत आहे. त्यांच्या आक्रमक पद्धतीला उत्तर देऊनच या प्रवासात कॉंग्रेसला उतरावे लागणार आहे. कॉंग्रेसच्या पक्ष संघटनेमध्ये जो एक संभ्रम आहे तो दूर करण्याची हीच वेळ आहे. तरुणांच्या हातात पक्ष द्यायचा की अनुभवी व्यक्तींना प्राधान्य द्यायचे हा संभ्रम अद्यापही कॉंग्रेस पक्षातून संपलेला नाही. साहजिकच कॉंग्रेस पक्षाचे नेतृत्व ठामपणे एखाद्या नेत्याकडे सोपवले जात नाही तोपर्यंत पक्षसंघटनेलाही बळकटी मिळणार नाही. आजही सोनिया गांधी यांच्या नावामागे कॉंग्रेसच्या हंगामी अध्यक्षा हेच पदनाम लावले जाते. कॉंग्रेसला अद्यापही पूर्णकालीन अध्यक्ष निवडता आलेला नाही. राष्ट्रीय पातळीवर ही अवस्था असताना अनेक राज्यांमध्ये कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष पूर्ण प्रभावीपणे काम करत नाहीत.
अंतर्गत गटबाजीने अद्यापही कॉंग्रेसला पोखरून टाकले असल्याने अनेक जिल्ह्यांमध्ये कॉंग्रेस पक्षातील गट एकमेकांच्या विरोधात उभे असल्याने त्याचाही फटका निवडणुकीच्या काळामध्ये पक्षाला बसतो, असे आजवर अनेक वेळा सिद्ध झाले आहे. आता गट-तट विसरून एकत्रपणे काम करण्याची गरज आहे. पूर्वी जेव्हा कॉंग्रेस पक्ष खूप मोठा होता तेव्हा हे गटाचे राजकारण समजण्यासारखे होते; पण आता हे राजकारण पक्षाला अधिक हानिकारक ठरू शकते. कॉंग्रेस पक्षसंघटनेच्या कार्यपद्धतीबद्दल आवाज उठवणारे जे काही महत्त्वाचे नेते होते त्यांचा आवाज दाबण्याचा किंवा त्यांच्याबद्दल मतं व्यक्त करण्याचा विषयही या ठिकाणी महत्त्वाचा आहे. हे सर्व नेते दीर्घकाळ कॉंग्रेस पक्षाशी संबंधित आहेत आणि त्या सर्वांनी कॉंग्रेस पक्षातील किंवा सत्तेमधील अनेक महत्त्वाची पदे उपभोगली आहेत.
त्यांना कॉंग्रेस पक्षाच्या प्रगतीबाबत आणि पक्षसंघटनेच्या नियोजनाबद्दल काळजी असल्याने त्यांनी काही भावना व्यक्त केल्या होत्या; पण याचा अर्थ त्यांनी पक्ष विरोधी भूमिका घेतली नव्हती. कॉंग्रेस पक्षांमधील महत्त्वाच्या आणि ज्येष्ठ नेत्यांच्या मतांचा आदर करणे हे सुद्धा महत्त्वाचे आहे. सोनिया गांधी यांनी दिलेल्या खडतर प्रवासाच्या कबुलीमुळे संघटनेला वास्तवाची जाणीव करून देण्यात आली असली तरी सकारात्मक पद्धतीने बदलणे आणि कॉंग्रेस पक्षाचे प्रभावीपणे पुनर्वसन करणे संपूर्णपणे कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि तळागाळात पसरलेला कॉंग्रेसचा कार्यकर्ता यांच्याच हातात आहे.