आळंदी : आळंदीतील देहू फाटा चौकातील एसटी महामंडळाच्या चार एकर जागेत पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) बस उभ्या करण्यास गेल्या शुक्रवारी (दि. 28) सुरुवात झाली. परंतु या बदलामुळे प्रवाशांची गैरसोय अधिकच वाढली आहे. आळंदीकरांना आता बसस्थानकासाठी दीड किलोमीटर चालत जावे लागत आहे. नव्या जागेत बसलागणी सुरू झाली असली तरी पायाभूत सुविधा नसल्याने प्रवासी त्रस्त झाले आहेत. स्थानकाच्या प्रवेशद्वारातच सांडपाणी आणि चिखल तुडवत जावे लागत आहे. बस स्थानकात प्रवाश्यांना बसायला जागा नाही, शेड नाही, प्रतीक्षालय नाही-कोणतीही सुविधा नसताना पीएमपीने बस थांबा हलविला असल्याचा नागरिकांचा आरोप आहे. विशेषत: विद्यार्थी, कामगार, महिला आणि वृद्ध भाविकांचे हाल वाढले आहेत.नगरपरिषद चौकातील बसथांब्यावर जागा अपुरी पडत असल्याने पीएमपीच्या 80 हून अधिक बसेस नव्या जागेत हलविण्यात आल्या. एसटी महामंडळाच्या चार एकर जागेत प्रशस्त परिसर उपलब्ध असला, तरी योग्य नियोजनाशिवाय अचानक हलविल्याने अस्वस्थता वाढली आहे. एसटी व पीएमपी दोन्ही गाड्या एका जागेत आळंदी शहराच्या मध्यवर्ती भागात एसटी महामंडळाची प्रशस्त जागा असली तरी, तिथे सध्या एसटी आणि पीएमपी दोन्ही बसेस उभ्या राहत असल्याचे चित्र आहे. एसटी महामंडळाने अधिकृतरीत्या जागा पी एम पीला मंजूर केली नसल्याने, भविष्यात या जागेत एसटीचे आगार उभे राहणार की पीएमपी स्थानक-याबाबत अद्याप स्पष्टता नाही. बसेस एकेरी मार्गाने सोडण्याची वाढती मागणी पुणे, पिंपरी-चिंचवड व उपनगरांतून येणार्या सर्व बसेस आळंदी स्थानकावर एकाच वेळी गर्दी करतात. एकावेळी सुमारे 50 ते 70 बसेस स्थानकात उभ्या राहतात. त्यातील अनेक बस जुन्या स्थानकावर सोडल्या जातात. चाकण चौक – भैरोबा चौक – जुने बसस्थानक या मार्गाने एकेरी परिक्रमा पद्धत राबवावी. यामुळे प्रवाशांना इच्छित स्थळी उतरता येईल, वाहतूक कोंडी टळेल, बसव्यवस्थेत शिस्त येईल. भाविक प्रवासी व स्थानिक नागरिकांनी हा मुद्दा तातडीने निकाली काढण्याची मागणी केली आहे.