नागपूर : अमरावती महापालिकेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत २२ भाजप उमेदवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून, पक्षाविरोधात प्रचार केल्याच्या आरोपावरून अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा यांची पक्षातून हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे. या २२ तक्रारदारांपैकी महापालिका निवडणुकीत दोघेजण विजयी झाले आहेत, तर २० जणांचा पराभव झाला आहे. त्यांनी दावा केला आहे की, नवनीत राणा यांनी भाजपच्या उमेदवारांना डमी उमेदवार म्हणून हिणवले आणि त्यांचे पती रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाच्या उमेदवारांना खरे भाजप उमेदवार म्हणून पुढे केले. महापालिका निवडणुकीपूर्वी भाजप आणि आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाची युती तुटली होती. या पत्रात नमूद केले की, भाजप उमेदवारांचा पराभव जनतेमुळे नव्हे, तर नवनीत राणा यांच्यामुळे झाला. आम्ही समर्पित आणि मेहनती पक्ष कार्यकर्ते आहोत, जे समाजाशी जोडलेले आहोत. परंतु या निवडणुकीतील आमचा पराभव विरोधकांमुळे नाही, तर भाजपच्या ज्येष्ठ नेत्या नवनीत राणा यांनी पक्षाविरोधात उघडपणे प्रचार केल्यामुळे झाला असल्याचे त्यांनी म्हटले. त्यांनी नवनीत राणा यांना भाजपमधून काढून टाकण्याची मागणी केली आहे. जर त्यांना पक्षातून बाहेरचा रस्ता दाखवला नाही, तर त्या भविष्यात अमरावती शहरात पक्षाचे अस्तित्व नष्ट करतील, असा दावा त्यांनी केला. ८७ सदस्यीय अमरावती महापालिकेत भाजपने २५ जागा जिंकल्या, युवा स्वाभिमान पक्ष आणि काँग्रेसला प्रत्येकी १५ जागा मिळाल्या आहेत.