Sanchar Saathi App। Technology – दूरसंचार विभागाने २८ नोव्हेंबर रोजी एक मार्गदर्शक सूचना जारी केली असून त्यानुसार सर्व मोबाइल कंपन्यांना त्यांच्या स्मार्टफोनमध्ये ‘संचार साथी’ अॅप प्री-इंस्टॉल करणे आवश्यक आहे. कंपन्यांना हा नियम लागू करण्यासाठी ९० दिवसांची मुदत देण्यात आली आहे. विरोधकांनी आता या मुद्द्यावर हल्ला तीव्र केला आहे. सरकारचा दावा आहे की हे अॅप फसवणूक, फोन चोरी आणि मोबाईल आयएमईआय नंबरशी संबंधित बनावट कॉल किंवा फसवणूक रोखण्यास मदत करेल. दरम्यान, काॅंग्रेससह सर्व विरोधक या अॅपला पाळत ठेवण्याचे साधन म्हणत आहेत. मोबाइल कंपन्यांनीही या अॅपला विरोध केला आहे. तर दुसरीकडे दूरसंचार विभागाच्या संचार साथी पोर्टलचा वापर आतापर्यंत २० कोटींहून अधिक लोकांनी केला आहे आणि हे अॅप १५ कोटींहून अधिक वेळा डाउनलोड केले गेले आहे. या प्लॅटफॉर्मचा वापर करून अंदाजे १ कोटी ७५ लाख बनावट मोबाइल कनेक्शन बंद करण्यात आले आहेत. याव्यतिरिक्त, २० लाख चोरीचे मोबाइल फोन शोधण्यात आले आहेत आणि ७५०,००० हून अधिक फोन त्यांच्या मालकांना परत करण्यात आले आहेत. असे प्रतिपादन केंद्रीय दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी केले आहे. दरम्यान, ‘संचार साथी ॲप’ आणि पोर्टल मे २०२३ मध्ये सुरू करण्यात आले असून, त्याचा मुख्य उद्देश मोबाईल फसवणूक थांबवणे, हरवलेले फोन शोधणे आणि दूरसंचार सुरक्षेत वाढ करणे हा आहे. मात्र, ‘संचार साथी ॲप’ची प्रमुख वैशिष्ट्ये काय आहेत? आणि या पोर्टलवर नोंद झालेली आतापर्यंतची आकडेवारी याबद्दल जाणून घेऊयात…. संचार साथी ॲपची प्रमुख वैशिष्ट्ये काय? – आपल्या नावावर किती मोबाइल कनेक्शन सक्रिय आहेत याची माहिती मिळते. – हरवलेला किंवा चोरी गेलेला मोबाइल फोन रिपोर्ट करून त्याला ब्लॉक करण्याची सुविधा. – फसवणूक करणारे वेब लिंक्स सहजपणे रिपोर्ट करता येतात. – बँक आणि वित्तीय संस्थांचे अधिकृत संपर्क क्रमांक तपासता येतात. – संशयित फ्रॉड किंवा स्पॅमची तक्रार त्वरीत नोंदवता येते. – वापरात असलेला मोबाइल हँडसेट मूळ आहे की नकली याची पडताळणी करता येते. – भारतीय नंबरसारखे दिसणारे आंतरराष्ट्रीय कॉल्स रिपोर्ट करता येतात. विभागीय अधिकाऱ्यांच्या मते, सध्या यूजर्सना अनेक सेवांसाठी वेबसाइटवर जावे लागते, ज्यासाठी वेळ लागतो. ॲप सक्तीचे केल्याने हे सर्व काम अधिक वेगाने आणि सुलभपणे होऊ शकेल. विशेष म्हणजे, तक्रार करताना IMEI क्रमांक लक्षात ठेवण्याची गरजही पडणार नाही, कारण ॲप फोनमधील माहिती स्वतः वाचू शकते. संचार साथी पोर्टलवर नोंद झालेली आतापर्यंतची आकडेवारी (सरासरी) : – ४२ .१४ लाखांहून अधिक मोबाइल फोन ब्लॉक केले गेले आहेत. – २६ .११ लाखांपेक्षा जास्त हरवलेले किंवा चोरी गेलेले फोन शोधण्यात यश. – २८८ लाखांहून अधिक नागरिकांनी त्यांच्या नावावर नोंद असलेल्या कनेक्शनची माहिती मागवली, त्यापैकी २५४ लाखांपेक्षा जास्त प्रकरणे सोडवण्यात आली. – ॲपचे १५ कोटीहून अधिक नोंदणीकृत यूजर्स. – गुगल प्ले स्टोअरवरून १ कोटी+ डाउनलोड, तर ॲपल स्टोअरवरून ९.५ लाख+ डाउनलोड. दरम्यान, Apple, Samsung, Xiaomi, Oppo, Vivo यांसारख्या मोठ्या स्मार्टफोन कंपन्यांना हे नियम अंमलात आणण्यासाठी ९० दिवसांची मुदत देण्यात आली असून, अंमलबजावणीचा अहवाल १२० दिवसांत सरकारला सादर करावा लागणार आहे.