पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपवर तीव्र शब्दांत टीका केली. भाजपच्या कार्यकाळात महापालिका भ्रष्टाचाराने पोखरली गेली असून शहर कर्जबाजारी झाल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. शहरात लुटारूंच्या टोळ्या दिवसाढवळ्या वावरत असल्याचा दावा करत अजित पवारांनी भाजपच्या कारभारावर सडकून टीका केली. अजित पवार म्हणाले की, फेब्रुवारी 2025 मध्ये महापालिकेची निवडणूक व्हायला हवी होती. 1992 पासून पिंपरी-चिंचवड शहराच्या विकासासाठी सर्व सहकाऱ्यांना विश्वासात घेऊन काम केले. 1992 ते 2017 या कालावधीत शहराचा कायापालट केला. मात्र 2017 मध्ये मोदी लाटेमुळे सत्ता गेली. त्या काळात विठ्ठल मूर्ती घोटाळ्याचे आरोप झाले, पण त्या वेळी महापौर असलेलेच आज भाजपमध्ये गेलेत. यावेळी त्यांनी शरद पवार यांनी पिंपरी-चिंचवडमध्ये विकासाला कशी गती दिली, याचे कौतुक केले. भाजपवर भ्रष्टाचाराचे आरोप करताना अजित पवार म्हणाले की, 2017 पूर्वी महापालिकेच्या ठेवी 4,844 कोटी रुपयांच्या होत्या, त्या आज केवळ 2,000 कोटींवर आल्या आहेत. ठेवी वाढायला हव्या होत्या, मात्र कर्जरोखे काढून कोट्यवधींचे कर्ज करण्यात आले. एवढा पैसा खर्च केला तर विकास कुठे आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. भाजपच्या सत्ताकाळात टेंडरमध्ये रिंग करून पैसे लाटले गेले, रस्ते अरुंद केल्यामुळे शहरात वाहतूक कोंडी वाढल्याचा आरोपही त्यांनी केला. “भाजपची राक्षसी भूक मला पाहवत नाही,” असे म्हणत अजित पवारांनी हफ्तेखोरी सुरू असल्याचा दावा केला. अर्बन स्ट्रीटच्या नावाखाली रस्त्यांची वाट लावण्यात आली असून अनेक ठिकाणी अतिक्रमण आणि हफ्तेखोरी सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. टेंडरमध्ये दादागिरी आणि आर्थिक गैरव्यवहार होत असल्याचे पुरावे आपल्याकडे असल्याचा दावाही त्यांनी केला. महापालिका कर्जबाजारी केल्याचा आरोप करत अजित पवारांनी भाजपच्या स्थानिक आमदार व पदाधिकाऱ्यांवर निशाणा साधला. काही लोकांची प्रॉपर्टी अचानक कशी वाढली, पैसा कुठून आला, असा सवाल त्यांनी केला. कुत्र्यांच्या नसबंदीपासून प्रत्येक कामात पैसे खाल्ल्याचा आरोप करत महापालिकेची अक्षरशः धुलाई करण्यात आल्याचे ते म्हणाले. भाजपच्या सत्ताकाळात स्थायी समितीचे अध्यक्ष नितीन लांडगे यांना अटक झाली, असे सांगत पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या इतिहासात असे कधी घडले नव्हते, असे अजित पवार म्हणाले. शहरात आता खोदाई माफिया वाढले असून जिओ, एअरटेल, व्होडाफोनसारख्या कंपन्या मनमानी पद्धतीने रस्ते खोदत असल्याचा आरोपही त्यांनी केला.