Jharkhand : झारखंडमधील हजारीबाग जिल्ह्यात बुधवारी भीषण स्फोटाची घटना घडली. हबीबीनगर परिसरात झाडे-झुडपे साफ करण्याचे काम सुरू असताना जमिनीत पुरुन ठेवलेल्या बॉम्बचा अचानक स्फोट झाला. या दुर्घटनेत दाम्पत्यासह तीन जणांचा जागीच मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी आहे. घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. स्थानिक नागरिकांच्या माहितीनुसार, हबीबीनगर परिसरात झाडे-झुडपे आणि कचरा साफ करण्याचे काम सुरू होते. याच दरम्यान फावडा किंवा इतर अवजारे जमिनीत लपवून ठेवलेल्या बॉम्बला लागल्याने मोठा स्फोट झाला. या घटनेची माहिती मिळताच सदर पोलिस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. संपूर्ण परिसराची नाकेबंदी करुन जखमींना बाहेर काढण्यात आले. तसेच, मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. पोलिस प्रशासनाने सांगितले की, बॉम्ब तिथे कसा आणि कोणत्या उद्देशाने ठेवण्यात आला होता, याचा सखोल तपास सुरू आहे. बॉम्ब जुना होता की, अलीकडेच ठेवण्यात आला, याचाही शोध घेतला जात आहे. पुरावे गोळा करण्यासाठी फॉरेन्सिक पथक घटनास्थळी पाचारण करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, याच परिसरात २०१६ साली रामनवमीच्या दंगलीदरम्यान बॉम्ब बनवताना झालेल्या स्फोटात पाच जणांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे पुन्हा एकदा याच भागात बॉम्बस्फोट झाल्याने सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.