Nitesh Rane : नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळा २०२६ मध्ये होणार असल्याने मोठ्या प्रमाणावर येथे संत साधू येणार आहे. त्यामुळे येथे तयारीला वेग आला असून, त्यांच्या निवासाच्या सोईसाठी तपोवनात व्यवस्था करण्यात येणार आहे. यासाठी तपोवन परिसरातील १८०० ते १८२५ झाडांवर कुऱ्हाड चालविण्यात येणार आहे. सरकारच्या या निर्णयाला पर्यावरणप्रेमींनी कडाकडून विरोध दर्शवला आला असून, मराठी कलाकारही वृक्षतोडीस विरोध दर्शवत आहेत. काल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने वृक्षतोड करण्यास विरोध दर्शवण्यात आला, त्यासाठी आंदोलन करण्यात आले. “पार्थ पवारांना जसं माफ केलं, तसं तपोवनातील झाडांनाही माफ करा”, असे मनसेचे अमेय खोपकर म्हणाले. अभिनेता संतोष जुवेकर याने देखील वृक्षतोडीला विरोध दर्शवत हात जोडून सरकारला विनंती केली आहे. अशातच राज्यात तपोवन वृक्षतोडीच्या प्रकरणावर राजकारण चांगलेच तापले असून, भाजपचे मंत्री नितेश राणे यांनी याबाबत एक वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यानंतर त्यांच्यावर मोठ्या प्रमाणावर टीका करण्यात आली. यानंतर त्यांनी आपल्या वक्तव्यावर स्पष्टीकरणही दिले होते. अशातच नितेश राणे यांनी ठाकरे बंधूंना पुन्हा डिवचलं आहे. बाळासाहेबांचा विचार ज्यांनी ज्यांनी सोडला हिंदुत्वपासून जे जे लांब गेले त्यांची काय अवस्था झालेली आहे हे त्यांनी त्यांच्या घरातच पाहवे, असा निशाणा नितेश राणे यांनी ठाकरे बंधूंना लगावला. हिंदुत्वापासून जो-जो लांब गेला तो संपलेला आहे, याचा बोध आदरणीय राज साहेबांनी घ्यावा, असेही नितेश राणे यांनी म्हटले आहे. त्यामुळे त्यांनी केलेल्या टीकेवर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे काय प्रत्युत्तर देतात हे पाहणे महत्वाचे असणार आहे. मनसे तपोवनासाठी आंदोलन करणार असल्याच्या प्रश्नावर उत्तर देताना नितेश राणे यांनी वरील प्रतिक्रिया दिली. नितेश राणे नेमकं काय म्हणाले? “मनसेला काय… हिंदू द्वेषांच्या बरोबर खांद्याला खांदा लावून काम करणारा आता मनसेना नावाचा एक पक्ष तयार होतोय. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या मुशीत तयार झालेले आमचे राजसाहेब ठाकरे यांनी हिंदुत्वचा धागा धरून राजकारण केलं, तरच त्यांच्यामध्ये बाळासाहेबांची छाप दिसणार आहे. बाळासाहेबांच्या विचार ज्यांनी ज्यांनी सोडला हिंदुत्वापासून जे जे लांब गेले त्यांची काय अवस्था झालेली आहे हे त्यांनी त्यांच्या घरातच पाहावे. उबाठाची जी काही अवस्था आज झालेली आहे हिंदूत्व सोडल्यामुळेच आहे. हिंदुत्वापासून जो जो लांब गेला तो संपलेला आहे, याचा बोध आदरणीय राज साहेबांनी घ्यावा. ” हेही वाचा : इंडिगोचा गोंधळ अन् हिवाळी अधिवेनालाही फटका; मंत्री, आमदारांची नागपूरमध्ये पोहचण्यासाठी उडाली तारांबळ