Eknath Shinde | Raj Thackeray | Uddhav Thackeray – शिवसेना (उबाठा) प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी १५ जानेवारी रोजी होणाऱ्या बृहन्मुंबई महानगरपालिका (बीएमसी) निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपल्या पक्षांच्या युतीची घोषणा केली. यावरती, ठाकरेबंधू हे केवळ सत्तेसाठी एकत्र आले आहेत, त्यांच्याकडे मुंबईच्या विकासासाठी कोणत्याही प्रकारचा कार्यक्रम नाही, असा आरोप उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे. पत्रकारांशी बोलताना शिंदे म्हणाले, ठाकरेबंधुच्या पत्रकार परिषदेत विकासाचा कोणताही उल्लेख नव्हता. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारसरणीपासून दूर गेलेल्यांना गेल्या वर्षीच्या विधानसभा निवडणुकीत आणि नगर परिषद व नगरपंचायत निवडणुकांमध्ये धडा शिकवण्यात आला आहे. त्यांच्याकडे विकासाचा कोणताही अजेंडा नाही. त्यांचे ध्येय फक्त सत्ता मिळवणे आहे. या लोकांनी मराठी भाषिकांना मुंबईतून बाहेर काढले. जेव्हा निवडणुका येतात त्यावेळी हे मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार असा बोर्ड लावतात. मुंबईकर सुज्ञ आहेत, त्यांना विकास पाहिजे. आम्ही घेतलेले निर्णय हे मुंबईकरांच्या हितासाठीचे आहेत. विधानसभा निवडणुका आणि अलीकडील स्थानिक निवडणुकांनी खरी शिवसेना कोणती आणि बनावट कोणती हे दाखवून दिले असल्याचे ते म्हणाले. त्यांनी ठाकरेंवर विकास प्रकल्प रोखल्याचा आरोपही केला आणि सांगितले की, मुंबईचा विकास हाच आमचा अजेंडा आहे. पुढच्या सहा महिन्यामध्ये मुंबई खड्डेमुक्त होणार आहे. महायुती सरकारने क्लस्टर विकास योजना सुरू केली आणि पुनर्विकास प्रकल्पांना गती दिली आहे.