Delhi air pollution । Arvind Kejriwal – राजधानी दिल्लीचे उपराज्यपाल व्ही.के. सक्सेना यांनी माजी मुख्यमंत्री आणि आपचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांना १५ पानांचे पत्र लिहिले असून त्यांनी दिल्लीतील प्रदूषणासाठी केजरीवाल यांनाच जबाबदार धरले आहे. दिल्लीत सध्या जी आणीबाणीसारखी परिस्थिती उदभवली आहे त्याचे खापर त्यांनी केजरीवालांच्या माथी फोडले आहे. केजरीवाल यांच्या सरकारचे ११ वर्षांचे दुर्लक्ष आणि गुन्हेगारी निष्क्रियतेमुळे दिल्लीची अशी अवस्था झाली आहे. केजरीवाल सरकारने दिल्लीतील लोकांच्या आरोग्याशी तडजोड केली आणि त्यांच्या पराभवानंतर संवादाचे सर्व मार्ग बंद केल्याचा आरोप सक्सेना यांनी पत्रात केला. जेव्हा तुम्ही मुख्यमंत्री होता आणि मी तुमच्याशी प्रदूषणाबद्दल बोललो होतो, तेव्हा तुम्ही म्हणायचे की हा फक्त १५-२० दिवसांचा गोंधळ आहे. त्यानंतर, मीडिया आणि स्वयंसेवी संस्था सर्वकाही विसरून जातील असे तुम्ही मला म्हणाला होतात असा आरोप पत्रात सक्सेनांनी केला आणि गेल्या ११ वर्षात काही काम झाले असते तर दिल्लीला या प्रदूषणाच्या परिस्थितीचा सामना करावा लागला नसता असा दावा त्यांनी केला. व्हीके सक्सेना पत्रात केजरीवालांना उद्देशून पुढे म्हणाले की तुम्ही फक्त मोठ्या घोषणा केल्या, पण कोणतेही काम केले नाही. तुम्ही सर्वांना कायम मूर्ख बनवू शकत नाही. त्यामुळेच तुमच्यासोबत असे घडले. दिल्लीच्या लोकांनी तुम्हाला पराभूत केले. दरम्यान, निवडणूक हरल्यानंतर अरविंद केजरीवाल यांना आपण दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी फोन केला होता, परंतु तेव्हा केजरीवाल यांनी आपला नंबर ब्लॉक केल्याचे लक्षात आल्याचे सक्सेना म्हणाले.