BMC Election Result । Narendra Modi – कॉंग्रेसचा जन्म मुंबईत झाला. मात्र, आज त्याच महानगरीत कॉंग्रेसची राजकीय घसरण झाली आहे. मुंबईत तो पक्ष चौथ्या किंवा पाचव्या स्थानावर फेकला गेला आहे, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील प्रमुख विरोधी पक्षावर जोरदार निशाणा साधला. आसाममध्ये रविवारी मोदींची सभा झाली. त्यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील महापालिका निवडणुकांच्या निकालांचा संदर्भ दिला. नकारात्मक राजकारणाचा संदेश देत असल्याने कॉंग्रेसने देशातील जनतेचा विश्वास गमावला आहे. त्याउलट, भाजप देशातील मतदारांची प्रथम पसंत बनला आहे. सुशासन आणि विकासासाठी मतदार भाजपवर विश्वास ठेवत आहे. बिहारमध्ये आम्ही २० वर्षांपासून सत्तेत होतो. तसे असूनही त्या राज्यातील विधानसभा निवडणुकीत जनतेने भाजपला विक्रमी मतं दिली. केरळमध्येही आमचा महापौर बनला आहे. नुकतेच महाराष्ट्रातील महत्वाच्या शहरांमधील निवडणुकांचे निकाल जाहीर झाले. जगातील मोठ्या महापालिकांपैकी एका असणाऱ्या मुंबईत भाजपला पहिल्यांदाच विक्रमी जनादेश प्राप्त झाला. आमच्या पक्षाला महाराष्ट्राच्या बहुतांश शहरांतील जनतेने सेवेची संधी दिली, असे ते म्हणाले. आसाम राज्य लवकरच विधानसभा निवडणुकीला सामोरे जाणार आहे. यावेळी त्या राज्याची सत्ता राखण्याचे मोठे आव्हान भाजपसमोर असल्याचे मानले जाते. त्या पार्श्वभूमीवर, मोदींनी देशभरात सुरू असलेल्या भाजपच्या विजयी घोडदौडीचा उल्लेख करताना मुंबई आणि महाराष्ट्राचा संदर्भ दिला.