मंचर : श्रीक्षेत्र भीमाशंकर ज्योतिर्लिंगाच्या सर्वांगीण विकासासाठी श्रद्धा आणि प्रशासन यांचा समन्वय साधत एक महत्त्वाचा व ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे. भीमाशंकर ज्योतिर्लिंग विकास आराखड्याअंतर्गत सुरू होणाऱ्या विकासकामांना गती देण्यासाठी मंदिर पुढील तीन महिने भाविकांच्या दर्शनासाठी तात्पुरते बंद ठेवण्यास स्थानिक ग्रामस्थांनी एकमुखी पाठिंबा दिला आहे. मंदिर नेमके केव्हापासून बंद ठेवण्यात येणार, याची अधिकृत घोषणा जिल्हाधिकारी करणार असल्याची माहिती प्रशासकीय अधिकाऱ्यांनी मंगळवारी (दि. २३) दिली. आंबेगाव–जुन्नरचे उपविभागीय अधिकारी गोविंद शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली श्रीक्षेत्र भीमाशंकर येथे झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीत प्रशासन, भीमाशंकर देवस्थान ट्रस्ट तसेच स्थानिक ग्रामस्थ यांच्यात सविस्तर चर्चा झाली. विकासकामे सुरक्षित, नियोजनबद्ध आणि वेळेत पूर्ण व्हावीत, यासाठी मंदिर तात्पुरते बंद ठेवणे आवश्यक असल्याचे सर्वानुमते मान्य करण्यात आले. श्रीक्षेत्र भीमाशंकर हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी सहावे अत्यंत महत्त्वाचे ज्योतिर्लिंग असून वर्षभर देशभरातून लाखो भाविक येथे दर्शनासाठी येतात. नाशिक येथे २०२७ साली होणाऱ्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर, तसेच प्रयागराज कुंभमेळ्यादरम्यान वाराणसी, अयोध्या, उज्जैन आदी तीर्थक्षेत्रांवर झालेली प्रचंड गर्दी लक्षात घेता, भविष्यात भीमाशंकर येथेही भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. ही संभाव्य गर्दी लक्षात घेऊन भाविकांसाठी दर्शन व्यवस्था, पायरी मार्ग, वाहनतळ, बस स्थानक, मूलभूत सुविधा आदी पायाभूत सोयी-सुविधा विकसित करण्यासाठी २८८.१७ कोटी रुपयांचा व्यापक विकास आराखडा राबविण्यात येत आहे. या आराखड्यातील कामे जलद गतीने आणि सुरक्षितरीत्या पूर्ण व्हावीत, यासाठीच मंदिर तात्पुरते बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बैठकीनंतर प्रशासन, देवस्थान ट्रस्ट व ग्रामस्थांच्या वतीने मंदिर परिसर, पायरी मार्ग, बस स्थानक व वाहनतळाची संयुक्त पाहणी करण्यात आली.या बैठकीस आंबेगाव–जुन्नरचे उपविभागीय अधिकारी गोविंद शिंदे, खेडचे उपविभागीय अधिकारी अनिल दौंडे, पोलीस उपविभागीय अधिकारी अमोल मांडवे, जिल्हा नियोजन अधिकारी गणेश दाणी, भीमाशंकर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष अॅड. सुरेश कौदरे, आंबेगाव तहसीलदार डॉ. सचिन वाघ, खेड तहसीलदार प्रशांत बेडसे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर पवार, पुरातत्त्व विभागाचे सहसंचालक डॉ. विलास वाहणे, उपकार्यकारी विश्वस्त मधुकर शास्त्री गवांदे, शरद बँकेचे संचालक मारुती लोहकरे, भीमाशंकरचे सरपंच दत्तात्रय हिले, निगडाळेच्या सरपंच सविता तिटकारे यांच्यासह देवस्थानचे विश्वस्त व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. दर्शनासाठी आग्रह धरू नये बैठकीत स्पष्ट करण्यात आले की, प्रशासनाच्या वतीने देवस्थान ट्रस्ट व ग्रामस्थांचे म्हणणे तसेच बैठकीचा सविस्तर अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करण्यात येईल. त्यानंतर जिल्हाधिकारी मंदिर बंद ठेवण्याबाबत अधिकृत आदेश काढणार आहेत. बंद काळात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी विशेष खबरदारी घेण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. तसेच या कालावधीत स्थानिक ग्रामस्थ, ब्रह्मवृंद, गुरव-पुजारी बांधव, प्रशासकीय अधिकारी व राजकीय पदाधिकाऱ्यांनी दर्शनासाठी आग्रह धरू नये, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले. विकासकामांच्या दृष्टीने सर्वांनी संयम, सहकार्य व सकारात्मक भूमिका घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले.