Anjali Damania Post : महाराष्ट्राच्या राजकारणात काल दिवसभर मोठ्या नाट्यमय घडामोडी घडल्या असून, राज्याचे क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांना जुने प्रकरण भोवले आहे. १९९५ सालच्या सदनिका प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते माणिकराव कोकाटे यांना दोषी ठरवण्यात आले आहे. त्यांच्या अटकेचे आदेश न्यायालयाने दिले असून त्यांना कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते. या प्रकरणात २ वर्षांची शिक्षा आणि १० हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. यामुळे महायुती सरकारवरची कोंडी झाली असून, काल रात्री कोकटे यांच्याकडे असलेले क्रीडामंत्री खाते काढून घेण्यात आले आहे. हे खाते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सोपविण्यात आले आहे. यामुळे कोकाटे आता बिनखात्याचे मंत्री झाले आहेत. अशातच मंत्री मंडळात पुन्हा एकदा आमदार धनंजय मुंडे यांचे कमबॅक होणार असल्याची जोरदार चर्चा सुरू असून, या चर्चेदरम्यान सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी एक्सवरून ट्वीट करत भाजपला थेट इशारा दिला आहे. एक्सवरील पोस्टमध्ये दमानिया यांनी धनंजय मुंडे यांनी दिल्लीत जाऊन भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्याचा एक फोटो शेअर केला आहे. ना खाउंगा ना खाने दुंगा म्हणणाऱ्या पक्षाचे अमित शहा, मला, म्हणजे भ्रष्टाचारा विरोधात लढणाऱ्या व्यक्तिला वेळ देत नाहीत, पण अजित पवार, प्रफुल पटेल, सुनील तटकरे, आणि आता धनंजय मुंडे यांना भेटण्याची वेळ देतात, अशी टीका केली आहे. यात काय ते समजून जा…. भाजपला काय बोलू…… शब्दच उरले नाहीत, असे म्हणत त्यांनी निशाणा साधला आहे. ना खाउंगा ना खाने दुंगा म्हणणाऱ्या पक्षाचे अमित शहा , मला, म्हणजे भ्रष्टाचारा विरोधात लढणाऱ्या व्यक्तिला वेळ देत नाहीत, पण अजित पवार, प्रफुल पटेल, सुनील तटकरे, आणि आता धनंजय मुंडे यांना भेटण्याची वेळ देतात. ह्यात काय ते समजून जा…. भाजपला काय बोलू…… शब्दच उरले नाहीत ज्या… pic.twitter.com/LEG0gYoFWx — Mrs Anjali Damania (@anjali_damania) December 17, 2025 पुढे त्यांनी म्हटले आहे की, ज्या धनंजय मुंडेंवर- १) बीड बँक घोटाळ्याचे आरोप आहेत २) बंदूक राज आणल्याचे आरोप आहेत ३) Mahagenco मधून राख चोरल्याचे आरोप आहेत ४) आवदा कंपनीकडून खंडणी मागितल्याचे आरोप आहेत ५) कृषी घोटाळ्याचे आरोप आहेत ६) दहशत, बंदुकराज, गुंडाराज केल्याचे आरोप आहेत… आणि सगळ्यात किळसवाणे म्हणजे ज्या क्रूर पद्धतीने स्व. संतोष देशमुख यांची हत्या ज्यांनी करवून घेतली, त्या विकृत वाल्मिक कराडची उणीव भासते, असे म्हणणारे धनंजय मुंडे जर परत मंत्री म्हणून परत आले, तर या भाजपाचा बहिष्कार लोकांनी केला पाहिजे. जर फडणवीसांनी हे होऊ दिले, तर मी या जन्मी त्यांना माफ करणार नाही, असा इशारा अंजली दमानिया यांनी एक्सवरून पोस्ट शेअर करत दिला आहे. हेही वाचा : ‘MCA’मेंस कॉर्पोरेट स्पर्धा २०२५-२६: पुनीत बालन क्रिकेट अकॅडमीचा दणदणीत विजय; कपील सन्सवर ८९ धावांनी मात