BJP | Rahul Gandhi – पंतप्रधान नरेंद्र मोदींवर तमिळ लोकांचा आवाज दाबल्याचा आरोप केल्याबद्दल भाजपने बुधवारी काँग्रेस नेते राहुल गांधींवर जोरदार टीका केली आणि त्यांचे हे वक्तव्य अत्यंत लज्जास्पद आणि निराधार असल्याचे म्हणत राहुल गांधी हे भारतीय राजकारणातील फुटीरतावादाचे उत्तम उदाहरण असल्याची टीका भाजपाने केली आहे. राहुल गांधींनी प्रांत, भाषा आणि जातीच्या नावावर देशात फूट पाडण्याचे राजकारण थांबवावे, असे भाजपने म्हणटले. अभिनेते आणि राजकारणी विजय यांच्या जन नायकन चित्रपटात केंद्र सरकारने अडथळे आणल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला होता. हा तमिळ संस्कृतीवर झालेला हल्ला असून पंतप्रधान नरेंद्र मोदी तमिळ जनतेचा आवाज कधीही दबू शकणार नाहीत, असे गांधी यांनी म्हटले होते. त्यांच्या या आरोपांना भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते गुरु प्रकाश पासवान यांनी पत्रकार परिषद घेत प्रत्युत्तर दिले. यावेळी पासवान यांनी गांधींच्या विधानाला तर्कहीन आणि वास्तवाशी कोणताही संबंध नसलेले म्हणटले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या ११ वर्षांत तमिळ भाषा, संस्कृती आणि वारशाप्रति दाखवलेली संवेदनशीलता अभूतपूर्व असल्याचे भाजपाने नमूद केले. पंतप्रधानांनी जागतिक व्यासपीठावर तमिळ ओळखीचा प्रचार केला असून, नुकत्याच झालेल्या परीक्षा पे चर्चा कार्यक्रमात उत्तर भारतातील विद्यार्थ्यांनाही तमिळ भाषा शिकण्याचे आवाहन केल्याची आठवण प्रवक्त्यांनी करून दिली. फुटीरतावादी प्रवृत्ती आणि राष्ट्रविरोधी मानसिकता असलेले लोकच भाषा आणि जातीचा आधार घेऊन राजकीय तांडव करत आहेत, असा आरोप भाजपने केला.