Pragya Satav : महापालिका निवडणुकांचे बिगुल वाजल्यानंतर राज्यात अनेक मोठ्या राजकीय घडामोडी घडताना दिसत आहेत. या निवडणुकीच्या काळातच काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला असून, लातूर जिल्ह्यातील मोठं नाव विधानपरिषदेच्या आमदार डॅा. प्रज्ञा सातव यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे. त्यांनी आज १८ डिसेंबर रोजी आमदारकीचा राजीनामा दिला असून त्यांनी अधिकृत भारतीय जनता पार्टीत पक्षप्रवेश केला आहे. त्यांच्यासह माजी नगरसेवक आणि जिल्हा परिषदेच्या सदस्यांनी हाती कमळ घेतले आहे. भाजपमध्ये पक्षप्रवेश केल्यानंतर डॅा. प्रज्ञा सातव यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. स्वर्गीय राजीव सातव यांचे विकासाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आणि देवाभाऊंच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राचा चौफेर विकासाला हातभार म्हणून भारतीय जनता परिवारामध्ये सामील होत असल्याची पहिली प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. माझे पती हिंगोलीचे भूमिपूत्र होते, त्यांनी हिंगोलीच्या विकासासाठी अथक प्रयत्न केले. मातोश्री रजनीताई सातव यांनी सुद्धा काम केले. त्यांच्यासोबत राहून मागील वीस वर्षांपासून विविध एनजीओच्या माध्यमातून शिक्षण संस्थांच्या माध्यमातून काम करत होते. साहेबांच्या निधनानंतर विधिमंडळात आमदार म्हणून काम करण्याची संधी मिळाली. राजीव भाऊंचे आशिवार्द, देवाभाऊंची साथ आणि सर्वजण मिळून येथून पुढे करू सर्व संकटांवरती मात, अशी घोषणाही त्यांनी दिली. तसेच त्यांनी भाजपमध्ये पक्ष प्रवेशासाठी प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांचे आभार मानले.