Shubman Gill Criticized Indian Batter : भारतीय भूमीवर इतिहास घडवत न्यूझीलंडने टीम इंडियाला त्यांच्याच घरात धूळ चारली आहे. इंदूर येथे रविवारी झालेल्या तिसऱ्या आणि निर्णायक एकदिवसीय सामन्यात भारताला ४१ धावांनी पराभव स्वीकारावा लागला. या पराभवासोबतच भारताने तीन सामन्यांची ही मालिका १-२ अशा फरकाने गमावली आहे. किवी संघाने (न्यूझीलंड) भारतात पहिल्यांदाच एकदिवसीय मालिका जिंकण्याचा पराक्रम केला असून, या ऐतिहासिक पराभवानंतर भारतीय कर्णधार शुबमन गिलने संघाच्या कामगिरीवर कडक शब्दांत ताशेरे ओढले आहेत. फलंदाज आणि क्षेत्ररक्षकांनी केला घात! सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत शुबमन गिलने पराभवाचे खापर प्रामुख्याने फलंदाजी आणि खराब क्षेत्ररक्षणावर फोडले. गिल म्हणाला, “गेल्या आठ दिवसांत आमचा संघ सर्वच विभागांत, विशेषतः फलंदाजीत पिछाडीवर राहिला. मला वाटते की आमच्यापैकी कोणालाही सुरुवातीच्या खेळीचे मोठ्या धावसंख्येत रूपांतर करता आले नाही. जेव्हा तुमचे आघाडीचे दोन-तीन फलंदाज मोठी खेळी करू शकत नाहीत, तेव्हा मोठी धावसंख्या उभारणे कठीण होते.” कुलदीप यादवचे कौतुक, पण… गोलंदाजीबद्दल बोलताना गिलने फिरकीपटू कुलदीप यादवचे समर्थन केले. “कुलदीप हा नेहमीच आमचा ‘स्ट्राइक बॉलर’ राहिला आहे. या मालिकेत त्याला जास्त विकेट्स मिळाल्या नाहीत हे दुर्दैव आहे, पण अशा मालिकाच आम्हाला भविष्यासाठी प्रगती करण्यास मदत करतात,” असे गिलने नमूद केले. हेही वाचा – Rinku Singh : न्यूझीलंड मालिकेपूर्वी रिंकू सिंग सापडला अडचणीत! पोलीस ठाण्यात तक्रार दाखल, नेमकं प्रकरण काय? फील्डिंगमधील चुका महागात पडल्या – पराभवाचे आणखी एक मोठे कारण म्हणजे भारताचे खराब क्षेत्ररक्षण. गिलने प्रांजळपणे कबूल केले की, “आमच्या क्षेत्ररक्षणाचा दर्जा या मालिकेत खूप खालावलेला होता. आम्ही महत्त्वाचे झेल सोडले. अशा सपाट खेळपट्ट्यांवर गोलंदाज जेव्हा संधी निर्माण करतात, तेव्हा त्यांना क्षेत्ररक्षणाची साथ मिळणे आवश्यक असते. न्यूझीलंड आणि आमच्यात हाच मुख्य फरक होता; त्यांनी उत्तम क्षेत्ररक्षण केले आणि त्यांच्या फलंदाजांनी मोठ्या खेळी साकारल्या.” हेही वाचा – Vidarbha Champion : विदर्भाचा ऐतिहासिक पराक्रम! पहिल्यांदाच कोरलं ‘विजय हजारे ट्रॉफी’वर नाव; बलाढ्य सौराष्ट्रला चारली धूळ आता लक्ष्य टी-२० मालिकेवर! एकदिवसीय मालिकेतील पराभवाचा धक्का विसरून भारतीय संघ आता टी-२० मालिकेसाठी सज्ज होत आहे. भारत आणि न्यूझीलंड दरम्यान २१ जानेवारीपासून पाच सामन्यांची टी-२० मालिका खेळवली जाणार आहे. ३१ जानेवारीपर्यंत चालणारी ही मालिका आगामी टी-२० विश्वचषकाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.