नेवासे : नेवासे तालुक्यातील चांदा गावात रविवारी (दि. ११) सायंकाळी धक्कादायक गोळीबाराची घटना घडली. चांदपीर देवस्थानच्या इनामी शेतीजवळ सुरू असलेल्या कंदुरी कार्यक्रमात जेवणासाठी आलेल्या मित्रांमध्ये वाद झाला आणि या वादाचे रूप थेट गोळीबारात झाले. या घटनेत चांदा बसस्थानक परिसरात राहणारा बकऱ्यांचा व्यापारी युवक शाहिद राजू शेख (कोतवाल) (वय २४) याचा जागीच मृत्यू झाला. सायंकाळी सुमारे पाच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. वादानंतर झालेल्या गोळीबारात शाहिद शेख याच्या छातीत गोळी लागल्याने त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. घटनेनंतर इतर तरुण शस्त्रांसह पसार झाल्याची चर्चा ग्रामस्थांमध्ये सुरू आहे. गोळीबाराचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. घटनेची माहिती मिळताच शिंगणापूर पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असता कोणतेही शस्त्र आढळून आले नाही. मयत शाहिद शेख याचा मृतदेह पुढील शवविच्छेदनासाठी नगर येथील जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. या घटनेमुळे चांदा गावात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वीही चांदा गावातील दोन टोळ्यांमध्ये जोरदार भांडणे झाली होती. त्या वेळीही गावठी कट्ट्यांचा वापर झाल्याचे समोर आले होते. मात्र पोलिसांनी योग्य ती कारवाई न केल्यामुळेच अशा गंभीर घटना घडत असल्याचा आरोप सुज्ञ नागरिकांकडून केला जात आहे. गावात अनेक तरुणांकडे बेकायदेशीर शस्त्रे असल्याची चर्चा उघडपणे सुरू असून, या घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.