Bangladesh Players Sponsorship ends by SG Sports : बांगलादेशातील हिंदू अल्पसंख्यांकांविरुद्ध सुरू असलेला हिंसाचार आणि दोन्ही देशांमधील वाढत्या तणावाचे पडसाद क्रिकेट विश्वात उमटत आहेत. भारताची प्रतिष्ठित क्रीडा साहित्य बनवणारी कंपनी ‘एसजी’ (SG) ने बांगलादेशी क्रिकेटपटूंसोबतचे आपले करार संपुष्टात आणण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. यामुळे बांगलादेशी खेळाडूंचे मोठे आर्थिक नुकसान होणार आहे. प्रमुख खेळाडूंचे प्रायोजकत्व धोक्यात – ‘एसजी’ कंपनी बांगलादेशचे दिग्गज खेळाडू कर्णधार लिटन दास, यासीर रब्बी आणि मोमिनुल हक यांना प्रायोजित (Sponsor) करत होती. अधिकृतपणे अद्याप खेळाडूंना कळवण्यात आले नसले तरी, त्यांच्या एजंट्सना करार नूतनीकरण न करण्याबाबत स्पष्ट संकेत देण्यात आले आहेत. येणाऱ्या काळात इतर भारतीय कंपन्याही बांगलादेशी खेळाडूंवर बहिष्कार टाकण्याची शक्यता आहे, ज्यामुळे बांगलादेशच्या स्पोर्ट्स इंडस्ट्रीला मोठा हादरा बसू शकतो. मुस्तफिजुर रहमान आणि वादाची ठिणगी – या वादाची खरी सुरुवात आयपीएलमधून झाली. बांगलादेशातील परिस्थिती पाहता मुस्तफिजुर रहमानला भारतात खेळवण्यावरून तीव्र विरोध होत होता. या दबावानंतर, बीसीसीआयच्या सूचनेनुसार कोलकाता नाईट रायडर्स (KKR) ने मुस्तफिजुरला संघातून रिलीज केले. या घटनेमुळे बांगलादेश क्रिकेट बोर्ड (BCB) नाराज झाले असून दोन्ही देशांचे क्रिकेट बोर्ड आमनेसामने आले आहेत. हेही वाचा – Ramkrishna Ghosh Over : ६ चेंडूत हव्या होत्या ६ धावा…मराठमोळ्या पठ्ठ्याच्या मेडन ओव्हरने महाराष्ट्राचा थरारक विजय! पाहा VIDEO आयसीसीकडून बांगलादेशला चपराक – बीसीसीआयसोबतच्या वादामुळे बांगलादेश क्रिकेट बोर्डाने आगामी टी-२० विश्वचषक २०२६ मधील आपले सामने भारतातून श्रीलंकेत हलवण्याची विनंती आयसीसीकडे (ICC) केली होती. मात्र, आयसीसीने ही विनंती फेटाळून लावली आहे. बांगलादेशला विश्वचषकासाठी भारतातच यावे लागेल आणि खेळाडूंच्या सुरक्षेची जबाबदारी बीसीसीआयची असेल, असे आयसीसीने स्पष्ट केले आहे.