Sanjay Raut : मुंबईत माध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी महाविकास आघाडीच्या (मविआ) जागावाटपाबाबत महत्त्वाची माहिती दिली. तसेच नगर परिषद निवडणुकीतील भाजपच्या विजयावर ‘ईव्हीएम’ आणि ‘पैशांचा पाऊस’ यावरून सडकून टीका केली. संजय राऊत म्हणाले की, महाविकास आघाडीतील जागावाटपाची चर्चा आता पूर्ण झाली आहे. कोणती जागा कोणी लढवायची, यावर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्रित लक्ष घालून सर्व अडचणी दूर केल्या आहेत. कार्यकर्त्यांच्या भावना आणि सन्मान जपला जाईल, अशी ग्वाही देत त्यांनी आजची बैठक शेवटची असल्याचे संकेत दिले. येत्या एक-दोन दिवसांत अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. काँग्रेसला सोबत घेण्याबाबत राऊत यांनी सकारात्मक भूमिका मांडली : काँग्रेस हा ‘मविआ’मधील राष्ट्रीय आणि महत्त्वाचा पक्ष आहे, त्यांची स्वतःची मोठी व्होटबँक आहे. राज ठाकरे यांच्या समावेशाबाबत काँग्रेसच्या काही तांत्रिक आणि वैचारिक अडचणी आहेत. “भाजपचा पराभव करण्यासाठी सर्वांनी एकत्र येणे गरजेचे आहे. आम्ही दिल्ली आणि महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांशी चर्चा करत आहोत. अजून ७२ तास हातात आहेत, तोपर्यंत आमचे प्रयत्न सुरू राहतील,” असे राऊत यांनी स्पष्ट केले. ईव्हीएम ‘सेटिंग’चा आरोप : नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीत महायुतीला मिळालेल्या यशावर राऊत यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते म्हणाले, “विधानसभेचे जे आकडे होते, तेच आकडे आताही दिसत आहेत. याचा अर्थ मशीन (EVM) अजूनही त्याच पद्धतीने सेट आहे. भाजपने सेटिंगमध्ये कोणताही बदल केलेला नाही, किमान आकडे तरी बदलायला हवे होते.” निवडणुकीतील खर्चावर टीका करताना राऊत म्हणाले की, ही निवडणूक लोकशाहीची नसून पैशांच्या ताकदीची होती. ३० कोटींचे बजेट असलेल्या नगरपालिकेसाठी सत्ताधाऱ्यांनी १५०-१५० कोटी रुपये खर्च केले. नगरपालिकेच्या प्रचारासाठी चार्टर फ्लाईट्स आणि हेलिकॉप्टरचा वापर झाला. ही स्पर्धा विरोधकांशी नसून सत्ताधारी पक्षांमध्येच (शिंदे गट, भाजप आणि अजित पवार गट) एकमेकांविरुद्ध होती. असा टोला त्यांनी लगावला.