Raj Thackeray : राज्यातील २९ महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीमधील नेत्यांच्या सभांचा धडाका सुरू झाला आहे. या निवडणुकीसाठी ठाकरे बंधूंनी देखील रणशिंग फुंकले असून, नाशिक येथे काल राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची संयुक्त सभा पार पडली. या सभेतून राज ठाकरे यांनी भाजप आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकेची तोफ डागली. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवर देखील राज ठाकरे यांनी भाष्य केले. १५०० रुपये पंधरा दिवसात संपतात, त्यामुळे हे पैसे टीकणार कसे असा सवाल त्यांनी उपस्थित करत लक्ष वेधून घेतले. तसेच तपोवनातील वृक्ष तोडीवर भाष्य करताना राज ठाकरे यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्यावर घणाघाती टीका केली. राज ठाकरे नेमकं काय म्हणाले? राज्य सरकार हे लोकांना जातीधर्माच्या नावाखाली भुलवून मते मिळवत आहे. सरकारने महिलांसाठी लाडकी बहीण योजना आणली. या योजनंतर्गत प्रत्येक महिन्याला महिलांना 1500 रुपये दिले जात आहेत. पण महागाई किती वाढली आहे. 1500 रुपये फक्त 15 दिवसांत संपतात. घरगुती गॅस सिलेंडर आता 1000 रुपयांना मिळतो. मग अशावेळी फक्त 1500 रुपये कसे टिकणार. राज ठाकरेंचे आवाहन पुढे बोलताना राज ठाकरे म्हणाले, “तुमच्या पुढच्या पिढ्या नंतर म्हणतील, आमच्या भवितव्याचा विचार कोणी केला नाही. आमचं शहर तसंच राहिलं, त्याचा विकास झाल नाही. आमचा बाप विकला गेला, आईने पैसे घेतले, त्यामुळे आमचं भविष्य चांगलं घडलं नाही, अशी तुमची मुलं म्हणतील. जर असे व्हायला नको असेल तर मनसे-शिवसेनेच्या नगरसेवकांना निवडून द्या, असे आवाहन राज ठाकरे यांनी केले. भाजपची उडवली खिल्ली राज ठाकरे यांनी आपल्या आक्रमक शैलीतील भाषणात नाशिकमध्ये मनसेची सत्ता असताना कशा प्रकारे विकास केला याबद्दल सांगितले. राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत कशा प्रकारे फोडाफोडीचे राजकारण सुरू आहे, यावर भाष्य करताना त्यांनी भाजपवर झोंबणारी टीका केली. 1952 साली जन्माला आलेल्या पक्षाला 2026 मध्येही दुसऱ्याची पोरे दत्तक घ्यायला लागतात, अशा धारधार शब्दांत राज ठाकरे यांनी भाजपची खिल्ली उडवली. गिरीश महाजन यांना लक्ष २०२७ मध्ये नाशिक येथे सिंहस्थ कुंभमेळा होणार आहे. या धर्तीवर राज्य सरकारकडून वेगवान गतीने कामे केली जात आहे. मात्र, तपोवनातील वृक्ष तोडीचा मुद्दा चांगला तापला होता. यावर बोलताना राज ठाकरे यांनी भाजप नेते मंत्री गिरीश महाजन यांच्यावर जोरदार टीका केली. पूर्वीचा लाकूडतोड्या बरा होता. त्याला देवीने विचारले सोन्याची, चांदीची कुऱ्हाड होती का? त्यालाही तो भाळला नाही. पण यांनी तपोवनातील झाडं छाटायच्या आधी पक्षातील लोकं, कार्यकर्ते छाटली आणि आता बाहेरून लोक आणली जातात. फडणवीसांवर टीका राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर देखील टीका केली. ते म्हणाले, निवडणुकीच्या काळात नाशिकमध्ये देवेंद्र फडणवीस आले आणि त्यांनी नाशिकला दत्तक घेतो असं सांगितलं. त्यांच्या सांगण्याला नाशिककर भुलले आणि आम्ही सत्तेत असताना केलेली कामं विसरले. दत्तक घेणारे फडणवीस नंतर पुन्हा नाशिकमध्ये फिरकलेच नाहीत. हेही वाचा : PCMC Election: मतदार ओळखपत्र नाही? चिंता सोडा,मतदान करण्यासाठी ‘ही’ १२ कागदपत्रे सोबत ठेवा