मुंबई – मुंबई महापालिका निवडणुकीतील प्रचारामध्ये सर्वांचे लक्ष लागलेल्या ठाकरे बंधूंच्या संयुक्त सभेतून राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा ‘लाव रे तो व्हीडीओ’ अंदाज दाखवत पहिला घाव उद्योगपती अदानी यांच्यावर घातला. २०१४ साली केंद्रात मोदी सत्तेवर आल्यापासून उद्योगपती गौतम अदानी यांच्या झालेल्या प्रगतीचा आलेख दाखवत मुंबई आणि देश विकायला काढल्याचा आरोप त्यांनी सत्ताधारी राज्य आणि केंद्र सरकारवर केला. राज ठाकरे म्हणाले, २०२४ साली मला एक व्यक्ती भेटली. त्याने मला जी माहिती दिली. तसेच ती माहिती दिल्यानंतर माझी माणसं माझी रिसर्ज टीम कामाला लागली. त्यामधून जी काही माहिती समोर आली ती आज मी तुम्हाला दाखवणार आहे. तसेच मी आज जे दाखवणार आहे ते पाहून समजा तुम्हाला भीती नाही वाटली, तर मला असे वाटते की या देशात निवडणुका न लढवलेल्याच ब-या. २०२४ नंतर मला हे सारे समजू लागले. साधारणत: विधानसभा निवडणुकीच्या आसपास आमच्या रिसर्च टीमकडून या सगळ्या गोष्टी मला कळायला लागल्या. ते पाहून मला धक्का बसायला लागला. आपण डोळे झाकून बसतो आणि आपल्या खालून काय खणले जाते हे आपल्याला कळतच नाही. अनेक हिंदी इंग्रजी वृत्तवाहिन्यांना ब्लॉक करून टाकलेले आहे. कुणी काही तुम्हाला दाखवणार पण नाही. काही दाखवले की वरने फोन येतो, जाहिराती बंद केल्या जातील म्हणून दट्ट्या बसतो, असा आरोप त्यांनी केला. त्यानंतर राज ठाकरे यांनी २०१४ साली नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले तेव्हा गौतम अदानी यांच्या उद्योग समुहाचे देशात असलेले स्थान आणि मागच्या १०-११ वर्षांत झालेला विस्तार याचा आलेख उपस्थितांसमोर मांडला. तसेच अदानी उद्योग समुहाने महाराष्ट्र आणि एमएमआर परिसरात कसे हातपाय पसरले हेही आलेखाच्या माध्यमातून दाखवले. राज ठाकरे म्हणाले, हे फक्त दहा वर्षांत घडले आहे. जगामध्ये असा एकही माणूस नसेल जो दहा वर्षांमध्ये इतका श्रीमंत झाला. कुठल्या उद्योगपतीने उद्योग करू नये, या मताचा मी नाही आहे. इतका दळभद्री विचाराचा मी नाही आहे. या देशामध्ये इतके उद्योगपती असताना एका माणसावरती इतकी मेहेरबानी या देशामध्ये होते. मी देशातले चित्र दाखवतच नाही. फक्त दहा वर्षांतील ही गोष्ट आहे. एकाच माणसाला एवढ्या गोष्टी दिल्या. वीज दिली, सिमेंट उद्योगामध्ये गौतम अदानी कधी नव्हतेच. मात्र आज ते देशातील दुस-या क्रमांकाचे व्यापारी आहेत. उद्या या माणसाने वीज बंद केली, तर आम्ही अंधारात जाऊ. सिमेंट महाग केले तर काही बोलू शकणार नाही. सगळी बंदरं अदानींना दिली गेली आहेत. सगळी विमानतळे अदानींना दिली गेली आहेत, असा आरोपही त्यांनी यावेळी केला.