पुणे – महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरु असताना प्रचाराने कळस गाठले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून मेळावे, झंझावाती रॅली आणि कोपरा सभांनी गाजलेला प्रचार आता अंतिम टप्प्यात आला आहे. उदाय, मंगळवारी (दि.१३ ) सायंकाळी साडेपाच वाजता जाहीर प्रचाराची मुदत संपणार आहे. यंदाची निवडणूक केवळ राजकीय लढाई नसून ती प्रतिष्ठा, बंडखोरी आणि बदललेल्या युती-आघाडीच्या समीकरणांची कसोटी ठरणारी आहे. पालिकेच्या निवडणुकीसाठी येत्या गुरुवारी म्हणजे १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान होणार आहे. पुणे पालिकेतील १६३ नगरसेवक पदासाठी (दोन बिनविरोध) निवडणूक होत असून एकूण १ हजार १४९ उमेदवार रिंगणात आहे. यंदाच्या पालिकेच्या निवडणुकीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे नवीन उदयाला आलेल्या आघाडी आणि युती. राज्यात झालेल्या राजकीय स्थित्यंतरांचे प्रतिबिंब पुण्याच्या गल्लीबोळात पाहायला मिळत आहे. धक्कादायक बाब म्हणजे, राज्यात सत्तेमध्ये भाजप, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेना असे एकत्र असणारे पक्ष पालिकेच्या निवडणुकीत मात्र एकमेकांसमोर उभे ठाकलेले दिसले. तसेच या निवडणुकीत उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी पुणे व पिंपरी -चिंचवड महापालिकेवर विशेष लक्ष केंद्रीत करून पुण्यात तळ ठोकला आहे. तसेच या निवडणुकीत अजित पवार यांचा राष्ट्रवादी कॉंग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार हे दोन्ही पक्ष एकत्रितपणे निवडणुक लढवित आहेत. भाजपने कोणालाही सोबत न घेता स्वतंत्रपणे निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर जोरदार प्रचार करत प्रचारात रंगत आणली आहे. काॉंग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि मनसे असे तीन पक्ष एकत्र येऊन निवडणूक लढवित आहेत. ही नवी समीकरणे या पालिका निवडणुकीत पहावयास मिळत आहे. उमेदवारी वाटपावरून सर्वच पक्षांमध्ये अंतर्गत धुसफूस झाल्याचे पाहायला मिळाले. विशेषतः सत्ताधारी पक्षाकडून उमेदवारी देताना निष्ठावंतांना डावलल्याचा आरोप पभातूनचे केला गेला. बाहेरून आलेल्यांना किंवा ऐनवेळी पक्षात प्रवेश केलेल्यांना उमेदवारी दिल्याने जुन्या कार्यकर्त्यांनी उघडपणे आपली नाराजी व्यक्त केली आहे. यामुळे अनेक प्रभागांत पक्षाच्या अधिकृत उमेदवारासमोर स्वकियांचेच बंडखोरीचे आव्हान उभे राहिले आहे. निवडणुकीच्या तोंडावर सत्ताधारी आणि विरोधी गटांमध्ये कार्यकर्त्यांची पळवापळवी शिगेला पोहोचली होती. आपला गड मजबूत करण्यासाठी दुसऱ्या पक्षातील वजनदार कार्यकर्त्यांना आपल्याकडे खेचण्यासाठी मोठी चढाओढ लागली होती. यामुळे प्रभागांमधील गणितेही पूर्णपणे बदलेली आहेत.