पुणे – राज्याची आर्थिक स्थिती बिघडलेली असताना मोफत योजनांच्या घोषणा करणे चुकीचे आहे. शेतकरी कर्जबाजारी असताना कर्जमाफी दिली जात नाही. लाडकी बहीण योजनेचे दोन महिन्यांचे पैसे एकत्र देणे हा निव्वळ निवडणूकपूर्व राजकीय निर्णय असल्याची टीका काँग्रेसचे माजी राज्यमंत्री व आमदार विश्वजीत कदम यांनी केली आहे. पुणे महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्ष आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची आघाडी असून, या आघाडीच्या वतीने काँग्रेस भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी शहर काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष अजित दरेकर, काँग्रेस नेते विरेंद्र किराड, अमीर शेख, यशराज पारखी, सुनील शिंदे, प्राची दुधाने आदी उपस्थित होते. यंदाच्या महापालिका निवडणुकीमुळे नागरिकांना आपला आवाज मांडण्याची संधी मिळत आहे. सत्ताधारी महायुतीमध्ये एकमेकांवर आरोप- प्रत्यारोप सुरू असून, राजकीय नाटक पाहायला मिळत आहे. खालच्या पातळीवरील टीका करूनही सत्तेत एकत्र राहून जनतेची फसवणूक केली जात आहे. पुणे शहरातील अनेक मूलभूत प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित असून, महापालिका निवडणूक उशिरा झाल्याने प्रशासक राजवटीत मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा आरोपही विश्वजीत कदम यांनी केला. राज्यात महिलांची सुरक्षितता ही सत्ताधाऱ्यांची जबाबदारी असून, त्यांच्यावर अत्याचार होऊ नयेत, यासाठी ठोस उपाययोजना केल्या पाहिजेत, असेही त्यांनी स्पष्ट केले. केंद्र व राज्यात सत्ताधारी असलेल्या भाजपने प्रचारात सुरुवातीला आघाडी घेतल्याचे दिसत होते. काँग्रेस आघाडीने प्रत्येक प्रभागात सक्षम उमेदवार देत प्रभावी प्रत्युत्तर दिले आहे. काँग्रेस पक्ष तळागाळात रुजलेला असून जनतेचा विश्वास काँग्रेसवर आहे, असे त्यांनी नमूद केले.