नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन करण्याची गरज अधोरेखित केली. शेतकरी उत्पादक संघटनेवरील कार्यशाळेला संबोधित करताना त्यांनी सांगितले , शेतकऱ्यांच्या सर्व समस्या शेतकऱ्यांच्या उत्पादक कंपनीच्या माध्यमातून जिल्ह्यांतील आयुक्तालय स्तरावर सोडवल्या पाहिजेत. शेतकऱ्यांच्या आकर्षणाचे केंद्र ठरलेल्या आणि नागपुरात मागील तीन दिवसांपासून सुरु असलेल्या ॲग्रो व्हिजन 2025 या कृषी प्रदर्शनात गडकरी बोलत होते. शेतकऱ्यांच्या प्रगती आणि विकासासाठी आपल्याला शेतकरी उत्पादक कंपनीची एक संघटना स्थापन करण्याची आवश्यकता आहे. शेतकरी उत्पादक कंपनीसह, ते कृषी उपकरणे, ट्रॅक्टर, कापणी यंत्र आणि इतर गोष्टी वापरू शकतात आणि त्यामुळे कर्ज फेडणे सोपे होईल. उत्पादन खर्च कमी करण्याची आणि उत्पादन वाढवण्याची गरज आहे. यामुळे शेतकरी समृद्ध होतील. उत्पादन सुधारण्यासाठी तंत्रज्ञान आणि एआयचा वापर करण्याची गरज अधोरेखित केली. कृषी पद्धती आणि पीक विविधीकरण सुधारण्यासाठी अॅग्रो व्हिजनने घेतलेल्या विविध उपक्रमांची त्यांनी माहिती दिली. अॅग्रो व्हिजनचे हे सोळावे प्रदर्शन आहे. याशिवाय फाऊंडेशनला 10 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल तयार करण्यात आलेल्या कॉफी टेबल बुकचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशनकरण्यात आले. या कार्यक्रमानंतर फडणवीस यांनी प्रदर्शनातील विविध संस्था आणि कंपन्यांच्या दालनांना भेट दिली. मुख्यमंत्र्यांनी शेतीतील आधुनिक तंत्रज्ञानाबाबत माहिती जाणून घेतली.