Virat Rohit Future ends all speculation : कसोटी आणि टी-२० मधून निवृत्त झालेले विराट कोहली आणि रोहित शर्मा एकदिवसीय विश्वचषक २०२७ बाबत गौतम गंभीर यांच्या योजनेत आहेत का? या बाबत बरीच चर्चा सुरू होती. या सगळ्यावर पडदा टाकत भारतीय फलंदाजी प्रशिक्षक सीतांशू कोटक यांनी कोहलीच्या एकदिवसीय संघातील स्थानाबाबत कोणताही वाद नाही, असे प्रतिपादन केले. विराटच्या भविष्याबद्दल आपल्याला बोलण्याची गरजच काय? रविवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या वनडेमध्ये भारताने १७ धावांनी विजय मिळवला. या सामन्यात विराट कोहलीने शतक झळकावून आपण अजूनही खेळू शकतो, हे दाखवून दिले. या विजयानंतर कोहलीबद्दल बोलताना कोटक म्हणाले, “तो खूप चांगली फलंदाजी करत आहे. त्याच्या भविष्याबद्दल आपल्याला बोलण्याची गरजच काय? तो ज्या पद्धतीने कामगिरी करत आहे, ती पाहता त्याची तंदुरुस्ती कशी आहे याबद्दल कोणताही प्रश्न आता राहिलेला नाही.” खेळाडू किंवा संघ व्यवस्थापन २०२७ च्या विश्वचषकाबद्दल फार पुढचा विचार करत नाही – सीतांशू कोटक पुढे म्हणाले, “भूमिकांबद्दल स्पष्टता, रिअल-टाइम शिक्षण आणि वरिष्ठ खेळाडूंनी दिलेला अनुभव हा या टप्प्यावर भारतीय संघासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. त्या संदर्भात कोहली अपरिहार्य आहे. जोपर्यंत तो अशीच फलंदाजी करत राहतो, तोपर्यंत इतर कोणत्याही गोष्टींबद्दल बोलण्याचा काही अर्थ नाही. खेळाडू किंवा संघ व्यवस्थापन २०२७ च्या विश्वचषकाबद्दल फार पुढचा विचार करत नाही. त्या संदर्भात वरिष्ठ खेळाडूंना खेळवायचे की नाही याबाबत कोणतीही चर्चा झालेली नाही.” हेही वाचा – IPL 2026 : फाफ डू प्लेसिसनंतर KKR च्या खेळाडूचाही मोठा निर्णय! IPL मधून माघार घेत पाकिस्तानच्या लीगला पसंती मला वाटत नाही की आम्ही २०२७ च्या विश्वचषकाबद्दल… फलंदाजी प्रशिक्षक पुढे म्हणाले, “मला वाटते की अशा गोष्टी घडू नयेत. ते (रो-को) हुशार आहेत, ते चांगली कामगिरी करत आहेत आणि ते संघात योगदान देत आहेत. आमच्यासाठी, एकदा संघ आला आणि सराव सुरू झाला की, आम्ही फक्त आनंद घेतो. मला वाटत नाही की आम्ही २०२७ च्या विश्वचषकाबद्दल काहीही बोलत आहोत. रविवारी कोहलीने त्याच्या एकदिवसीय कारकिर्दीतील ५२ वे शतक केले, हे तो आता ज्या फॉरमॅटला प्राधान्य देतो त्यात तो किती निर्भयपणे जबाबदारी पार पाडत आहे याचे एक उदाहरण आहे.”