Chandrakant Patil : राज्यातील मुंबईसह २९ महापालिका निवडणुकीसाठी १५ जानेवारीला मतदान होणार आहे. या निवडणुकीत सगळ्यात चर्चेत असलेली निवडणूक ही मुंबई महापालिकेची ठरली आहे. मुंबईत भाजप शिवसेनेच्या युतीने तगडे नियोजन केल्याचे पाहायला मिळाले. तर दुसरीकडे ठाकरे बंधूंनी देखील निवडणूक आपल्या हातात घेऊन सत्ताधाऱ्यांवर सडकून टीका केली. मुंबईचा महापौर कोण होणार? या एका प्रश्नावर निवडणूक गाजली. या सगळ्यात आता भाजपचे ज्येष्ठ नेते मंत्री चंद्रकांत पाटील यांनी थेट शिवसेना उबाठा आणि मनसेच्या किती जागा मुंबईत येऊ शकतात, याचे आकडे सांगत भाकित वर्तवले आहे. ठाकरे बंधूंना राजकीय आणि कुटुंबीकदृष्ट्या एकत्र येण्यासाठी तब्बल २० वर्षांचा काळ लोटला गेला. कुठच्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे, असे म्हणत राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत मुंबई महापालिकेसाठी राजकीय युती केली. या निवडणुकीसाठी ठाकरे बंधूंना किती यश मिळेल हे १६ तारेखेला समजेलच, तत्पूर्वी मंत्री चंद्रकांत पाटील यांनी भाकित वर्तवत मुंबईत ठाकरेंच्या सेनेला ४५ तर मनसेला २० जागा मिळतील, असा मोठा दावा केला आहे. ते सांगलीत निवडणुकीच्या प्रचारासाठी आले असताना त्यांनी हा दावा केला आहे. सांगली महापालिकेत भाजपचाच महापौर होईल, असा विश्वासही त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला. इतक्यावरच न थांबता राज्यातील २९ पैकी २८ महापालिकेत युतीचे महापौर होतील, असेही चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत. यामध्ये सर्वाधिक महापौर हे भाजपचेच असतील, असा दावाही पाटील यांनी केला आहे. यामुळे निवडणुकांचा निकाल लागण्याअगोदरच चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केलेली भविष्यवाणी राज्याच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरत आहे. नेमकं काय म्हणाले चंद्रकांत पाटील? “मी संख्या सांगण्यात माहिर मानल्या जातो. भाजपच्या आणि शिवसेनेच्या किती जागा निवडून येणार हे मी कानात सांगेन, तर उद्धव सेनेला 45 आणि राज ठाकरे यांच्या पक्षाला 20, त्या पुढं गाडी बंद.”, असे विधान चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. यामुळे आता आकडेमोडीवर ठाकरे गोटातून काय प्रतिक्रिया येते याकडे लक्ष असणार आहे. हेही वाचा : Egg vs Soybean: १ अंडा की १०० ग्रॅम सोयाबीन? कशात जास्त प्रोटीन? जाणून घ्या सोप्या शब्दांत