Sanjay Raut : अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत कुणात्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेले नाही. पण भाजपने सर्वाधिक जागा जिंकल्या आहेत. हेही तितकेच खरे आहे. मुंबई महापालिकेसाठी भाजप-शिवसेना (शिंदे) या दोन्ही पक्षांनी महायुती म्हणून निवडणूक लढवली होती. महायुतीला घवघववीत यश मिळाले असून, आता सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. अशातच एक मोठी बातमी समोर आली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या निवडून आलेल्या २९ नगरसेवकांना फाईव्ह स्टार हॅाटेलमध्ये ठेवले आहे. यामुळे आता हॅाटेल पॅालिटिक्सची चर्चा सुरू झाली असून, पडद्याआडून नेमकं काय सुरू आहे यावर तर्क वितर्क लढवले जात आहेत. मुंबई महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर मुंबईचा महापौर निवडीवरून राजकारण चांगलेच तापले आहे. या सगळ्यात आज ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली. तसेच शिंदेंनी आपल्या नगरसेवकांना हॉटेलमध्ये ठेवल्याच्या मुद्द्यावर देखील राऊत यांनी भाष्य करत सणसणीत टोला लगावला आहे. “एकनाथ शिंदे यांचा पक्ष म्हणजे भाजपचे अंगवस्त्र आहे आणि त्यांचे प्रमुख अमित शहा आहेत,” अशा शब्दांत संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे. शिंदेंनी आपल्या नगरसेवकांना हॉटेलमध्ये ठेवल्याच्या मुद्द्यावर राऊत म्हणाले, एकनाथ शिंदे स्वतः उपमुख्यमंत्री आहेत, तरीही त्यांना आपले नगरसेवक पळवले जातील अशी भीती वाटते, ही मोठी ‘हास्यजत्रा’ आहे. त्यांनी आमदारांना सुरतला नेले होते, आता नगरसेवकांना कोंडून ठेवले आहे. २९ नगरसेवकांना कोंडणे हा मराठी अस्मितेचा कोंडमारा आहे. निकालानंतर उद्धव ठाकरे यांनी जर देवाची इच्छा असेल तर मुंबई महापालिकेवर शिवसेनेचा महापौर बसेल असे विधान केले होते. या विधानानंतर संजय राऊत यांनी जर महायुतीचाच महापौर बसणार असेल, तर नगरसेवक कोंडून का ठेवले? याचे उत्तर ‘देवाभाऊ’ (देवेंद्र फडणवीस) यांनी द्यावे, असे ते म्हणाले आहेत. संजय राऊत यांनी सूचक संदेश तर दिला? महापौर निवडीवरून जे काही सध्या मुंबईच्या राजकारणात सुरू आहे त्यामुळे पडद्यामागच्या राजकारणाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. “देवाची इच्छा असेल तर शिवसेनेचाच महापौर बसू शकतो. पडद्यामागे बऱ्याच गोष्टी घडत आहेत. असे संजय राऊत म्हणाले आहेत. तसेच बहुमत कितीही असले तरी ते चंचल असते. भाजपचा महापौर होऊ द्यायचा नाही, हे सर्वांनी ठरवले आहे,” असेही राऊत यांनी स्पष्ट केले आहे. नगरसेवकांना कोंडून ठेवले तरी संपर्क करण्याची अनेक साधने असतात असे म्हणत संजय राऊत यांनी सूचक संदेश तर दिला नाही ना अशा चर्चा झडू लागल्या आहेत. हेही वाचा : मौनी अमावस्येला संगमच्या काठावर गोंधळ ; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांचा पवित्र स्नानास नकार