Dharmendra | Marathi Movie : हिंदी चित्रपटसृष्टीतील ‘ही-मॅन’ आणि दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांचे निधन झाले आहे. ८९ वर्षांच्या या व्यक्तीने मुंबईतील त्यांच्या राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते आणि रुग्णालयातही दाखल होते त्यानंतर त्यांना घरी सोडण्यात आले होते. तेव्हापासून ते त्यांच्या कुटुंबासोबत त्यांच्या घरी वेळ घालवत होते. मात्र, सोमवारी (दि. २४ ) सकाळी त्यांचे निधन झाले. अभिनेते धर्मेंद्र यांनी आपल्या कारकरिर्दीत अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. त्यांनी आपल्या करिअरची सुरूवात १९६० मध्ये आलेल्या ‘दिल भी तेरा हम भी तेरे‘ या सिनेमातून केली. परंतु, तुम्हाला माहितीये का एकीकडे बॉलिवूडमध्ये प्रसिद्धीच्या शिखरावर असताना त्यांनी आपल्या मैत्रीखातर एका मराठी सिनेमात काम केलं. जेष्ठ चित्रपट समीक्षक दिलीप ठाकूर यांनी एका मुलाखतीत धर्मेंद्र यांची आठवण शेअर केली होती. मुंबईतील चांदिवली स्टुडिओचे मालक हेमंत कदम यांचे मित्र होते. त्यावेळी मैत्रीसाठी धर्मेंद्र यांनी हेमंत कदम यांच्या हिच काय चुकलं या चित्रपटातील एका गाण्यासाठी शूटिंग केलं होतं. ‘घेऊन टांगा सर्जा निघाला, दूर धन्याचा गाव… अरे तू धाव’, असं या गाण्याचं नाव आहे. या गाण्यात त्यांनी विक्रम गोखलेंसोबत अभिनय केला होता. ‘हिचं काय चुकलं’ हा चित्रपट साल १९८५ साली प्रदर्शित झाला. या चित्रपटात विक्रम गोखले, विजय कदम, रंजना असे तगडे कलाकार होते. त्याकाळी धर्मेंद्र यांचं ते घेऊन टांगा सर्जा निघाला हे गाणं चांगलंच गाजलं होतं. हे गाणं शबीर कुमार यांनी गायले आहे.