Devendra Fadnavis : नगर परिषद निवडणुकीतील महायुतीच्या घवघवीत यशानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांच्या आरोपांना चोख प्रत्युत्तर दिले. २०१४ पासून भाजपचा वरचष्मा कायम असून ग्रामीण भागातही पक्षाची पकड मजबूत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. फडणवीस म्हणाले की, २०१४ नंतरच्या प्रत्येक निवडणुकीत भाजपने शहरांपासून गावांपर्यंत विजय मिळवला आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत जागा कमी झाल्या असल्या, तरी भाजपची मते कमी झालेली नाहीत. ग्रामीण भागातही मतदारांनी भाजपला मोठी पसंती दिली असून, भाजप हा सर्व जाती-धर्मांना सोबत घेऊन चालणारा महाराष्ट्रातील पहिल्या क्रमांकाचा पक्ष असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले. निवडणुकीतील रणनीतीवर बोलताना त्यांनी कार्यकर्त्यांचे महत्त्व अधोरेखित केले. लोकसभा आणि विधानसभेत जे कार्यकर्ते नेत्यांना निवडून आणतात, त्यांच्या स्वतःच्या निवडणुकीत त्यांना एकटे सोडणे हा ‘करंटेपणा’ आहे. भाजप कधीही निवडणुकीतून पळ काढत नाही. १० हजार लोकसंख्येचे गाव असले तरी आम्ही ताकदीने उतरतो, कारण कार्यकर्त्यांची प्रतिष्ठा आमच्यासाठी महत्त्वाची आहे. पराभवाच्या भीतीने विरोधकांची पाठ फिरवली? विरोधी पक्षांच्या मानसिकतेवर टीका करताना फडणवीस म्हणाले, “महायुतीचा विजय निश्चित आहे हे लक्षात आल्यामुळेच विरोधक प्रचारात सक्रिय झाले नाहीत. आता पराभव समोर दिसू लागल्यावर, कार्यकर्त्यांचे मनोधैर्य खचू नये म्हणून ‘आम्ही ही निवडणूक गांभीर्याने घेतलीच नव्हती’ असा बनाव ते करत आहेत. आगामी महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीत पराभवाचा परिणाम टाळण्यासाठी हे केवळ एक निमित्त आहे.” ते पुढे म्हणाले, रत्नागिरीत महायुती म्हणून लढल्याने यश मिळाले. सिंधुदुर्गात युती नसतानाही काही ठिकाणी यश मिळाले तर काही ठिकाणी पराभव झाला. जिथे जिथे भाजप आणि महायुती ताकदीने लढली, तिथे जनतेने आम्हालाच कौल दिला आहे, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.