मुंबई : हिंदी चित्रपटसृष्टीतील ‘ही-मॅन’ आणि दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांचे निधन झाले आहे. 89 वर्षांच्या या व्यक्तीने मुंबईतील त्यांच्या राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते आणि रुग्णालयातही दाखल होते त्यानंतर त्यांना घरी सोडण्यात आले होते. तेव्हापासून ते त्यांच्या कुटुंबासोबत त्यांच्या घरी वेळ घालवत होते. मात्र, सोमवारी (दि. 24 ) सकाळी त्यांचे निधन झाले. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धर्मेंद्र यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. भारतीय चित्रपटसृष्टीचा सुवर्णकाळ गाजवणारा लखलखता तारा निखळल्याची शोकभावना व्यक्त करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्येष्ठ अभिनेते पद्मभूषण धर्मेंद्र यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. सोशल मीडियावर त्यांनी पोस्ट शेअर केली आहे. त्यात म्हणतात की, ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचा हिंदी चित्रपट सृष्टीतला प्रवास वैशिष्ट्यपूर्ण राहिला. कृष्ण- धवल काळ ते रंगीत आणि अलिकडच्या तांत्रिकदृष्ट्या आधुनिक प्रवाहात ते कार्यशील राहिले. ते चित्रपट सृष्टीतील बदलाचे, भरभराटीपासून ते आतापर्यंतच्या काळाचे महत्वाचे साक्षीदार राहिले. नायक म्हणून तरूण वयात सालस, स्वप्नाळू नायक ते विविध चित्रपटात वाट्याला आलेल्या भूमिका त्यांनी अभिनयाने आयकॉनिक ठरवल्या. शोले चित्रपटातील पडद्यावरील वीरू प्रमाणेच ते प्रत्यक्षातही मैत्र जपणारे होते. सहृदय आणि जुन्या-नव्या पिढीला जोडणारे, अनेकांसाठी आधार, मार्गदर्शक व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ख्याती होती. या क्षेत्रातील ज्येष्ठत्व ते तितक्याच उमद्यापणाने मिरवत असत. मध्यंतरी त्यांनी लोकसभेत भारतीय जनता पक्षाचे खासदार म्हणून बिकानेरचे प्रतिनिधीत्व केले होते. पण त्यांनी चित्रपटसृष्टी आणि अभिनय, या क्षेत्रातील प्रयोगशीलता यांनाच अधिक प्राधान्य दिले. सुमारे तीनशेहून अधिक चित्रपटांमध्ये त्यांनी वैविध्यपूर्ण भूमिका साकारल्या. एकाच वर्षांत ९ हिट चित्रपट देण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे. आयुष्याच्या अखेरच्या क्षणापर्यंत ते चित्रपट सृष्टीत सक्रिय राहिले. त्यांच्या निधनाने आपल्या चित्रपट सृष्टीचा सुवर्णकाळ गाजवणारा तारा निखळला आहे. ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांच्या निधनामुळे देओल कुटुंबीयांसह, त्यांच्या चाहत्यांवर दुःखाचा आघात झाला आहे. आम्ही या सर्वांच्या दुःखात सहभागी असून त्यांना ईश्वराने आघात सहन करण्याची ताकद द्यावी, अशी प्रार्थना करतो. ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांच्या निधनामुळे चित्रपट सृष्टीची मोठी हानी झाली असून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. एका संपूर्ण युगाचा अंत.! PM मोदी “धर्मेंद्रजींचे निधन हे भारतीय चित्रपटसृष्टीच्या एका संपूर्ण युगाचा अंत आहे. ते अद्वितीय व्यक्तिमत्त्वाचे आणि अत्यंत प्रतिभावान कलाकार होते. त्यांच्या साधेपणाने, विनम्रतेने आणि आत्मीयतेने त्यांनी लाखो-कोट्यवधी चाहत्यांची मने जिंकली. त्यांच्या परिवाराला, मित्रपरिवाराला आणि सर्व चाहत्यांना माझ्या संवेदना. ॐ शांती.” राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा हळहळ व्यक्त करणारा संदेश राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनीही श्रद्धांजली वाहताना म्हटले, “ज्येष्ठ अभिनेते आणि माजी खासदार धर्मेंद्रजींचे निधन भारतीय सिनेसृष्टीसाठी अपूरणीय हानी आहे. त्यांच्या दशकेभर चाललेल्या चमकदार कारकिर्दीत त्यांनी अनेक अविस्मरणीय भूमिका साकारल्या. त्यांनी मागे ठेवलेली समृद्ध परंपरा नव्या पिढीच्या कलाकारांना सतत प्रेरित करत राहील.” असं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हंटलं आहे.