Kishori Pednekar : मुंबईच्या माजी महापौर आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेत्या किशोरी पेडणेकर यांच्याविरोधात भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. निवडणुकीसाठी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात प्रलंबित गुन्ह्यांची माहिती लपवून पेडणेकर यांनी निवडणूक आयोगाची दिशाभूल केल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे. याप्रकरणी त्यांनी निवडणूक आयोगाकडे रीतसर तक्रार दाखल करत कठोर कारवाईची मागणी केली आहे. काय आहे नेमके प्रकरण? निवडणूक आयोगाच्या नियमांनुसार, निवडणूक लढवणाऱ्या प्रत्येक उमेदवाराला आपल्यावर असलेल्या फौजदारी गुन्ह्यांची आणि कायदेशीर प्रकरणांची माहिती प्रतिज्ञापत्राद्वारे (Affidavit) जाहीर करणे बंधनकारक असते. किरीट सोमय्या यांच्या दाव्यानुसार, किशोरी पेडणेकर यांनी मुंबई महानगरपालिका निवडणुकीवेळी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांच्यावरील गुन्ह्यांची नोंद केलेली नाही. हा प्रकार निवडणूक नियमांचे थेट उल्लंघन असून मतदारांची फसवणूक असल्याचा दावा सोमय्या यांनी केला आहे. सोमय्यांनी पत्रात नमूद केलेले गुन्हे : किरीट सोमय्या यांनी या संदर्भात दोन मुख्य प्रकरणांचा उल्लेख केला आहे. पहिला म्हणजे, बॉडी बॅग घोटाळा प्रकरण, कोविड काळात मृतदेह वाहून नेण्याच्या पिशव्यांच्या खरेदीत झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी आग्रीपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. आणि दुसरा एसआरए (SRA) घोटाळा प्रकरण, वरळीतील गोमाता जनता एसआरए सोसायटीमध्ये झोपडपट्टीवासीयांचे गाळे बळकावल्याच्या आरोपावरून निर्मल नगर पोलीस ठाण्यात दाखल झालेला गुन्हा. “किशोरी पेडणेकर यांनी जाणीवपूर्वक ही माहिती लपवून निवडणूक आयोगाची फसवणूक केली आहे. पुराव्यानिशी तक्रार केल्यानंतर आता त्यांची सखोल चौकशी होईल आणि कायद्यानुसार त्यांना कडक कारवाईला सामोरे जावे लागेल,” असा इशारा किरीट सोमय्या यांनी दिला आहे. राजकीय परिणाम आणि शक्यता : राज्यात सध्या निवडणुकीचे वातावरण तापलेले असताना किरीट सोमय्या यांनी हा जुना मुद्दा पुन्हा लावून धरल्याने ठाकरे गटाची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. जर हे आरोप निवडणूक आयोगाच्या चौकशीत सिद्ध झाले, तर किशोरी पेडणेकर यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल होऊ शकतो. निवडणूक नियमांच्या उल्लंघनामुळे त्यांना अपात्रतेच्या कारवाईला सामोरे जावे लागू शकते.