मुंबई : मुंबई महापालिका निवडणूक 2026 च्या पार्श्वभूमीवर कुलाबा परिसरातील वॉर्ड क्रमांक 226 मधील ठाकरे गटाच्या उमेदवार तेजल पवार आणि त्यांच्या कुटुंबाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. राहुल नार्वेकर यांनी धमकावून उमेदवारी मागे घेण्याचा दबाव टाकला, तसेच पैशांची ऑफर दिल्याचा आरोप खासदार अरविंद सावंत यांनी केला आहे. तेजल पवार आणि त्यांचे पती दीपक पवार यांनी बुधवारी शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली. तेजल पवार यांनी सांगितले की, 30 डिसेंबर रोजी त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर राहुल नार्वेकर यांनी त्यांच्या गाडीतून माझ्या पतीला त्यांच्या कार्यालयात नेले. तिथून फोनवर मला उमेदवारी माघार घेण्यास सांगण्यात आले. पती घरी परतले तेव्हा त्यांच्या सोबत राहुल नार्वेकर यांचा पीए होता. त्याने मला पैशांची ऑफर दिली. सुरुवातीला ही ऑफर लाखोंची होती, नंतर ती कोट्यवधी रुपयांपर्यंत गेली. दुसऱ्या दिवशी पुन्हा पीए आमच्या घरी आला, मात्र मी दार उघडले नाही, असे तेजल पवार म्हणाल्या. दीपक पवार यांनीही राहुल नार्वेकर यांच्यावर गंभीर आरोप केले. ते म्हणाले, राहुल नार्वेकर मला म्हणाले, कशाला निवडणूक लढताय? त्यांचा पीए सतत फोन करत होता. शेवटच्या दिवशी पीएने मला जबरदस्ती कार्यालयात नेले. गोडीत सांगतोय, तरी कळत नाही का, अशी धमकी दिली. कार्यालयात गेल्यानंतर माझ्या पत्नीचा उमेदवारी अर्ज माघार घ्यावा, यासाठी प्रचंड दबाव टाकण्यात आला. राहुल नार्वेकर मला म्हणाले, मी कोणत्या पदावर आहे हे तुला माहिती नाही का? मी बोलावल्यावर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनाही यावं लागतं. पुढे दीपक पवार यांनी सांगितले की, राहुल नार्वेकर यांनी मला कुलाब्यात राहायचं की नाही, ते तू ठरव, असे म्हणत राजू नावाच्या कार्यकर्त्याचे उदाहरण दिले. राजू निवडणूक लढणार अशी घोषणा झाल्यानंतर त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल झाल्याचा उल्लेख केला. हे ऐकून मी घाबरलो. नंतर राहुल नार्वेकर यांचा पीए माझ्यासोबत घरी आला. तो निघून गेल्यानंतर आम्ही घाबरून फोन बंद केले आणि घरातून बाहेर पडलो. सर्वजण आम्हाला शोधत होते. माझ्या पक्षाकडूनही मला साथ मिळाली नाही. अखेर मी शिवसेना भवनात आलो, असे दीपक पवार यांनी सांगितले. या आरोपांमुळे मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण अधिकच तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे.