Mumbai Municipal Corporation Election : आज मुंबई महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा दिवस असून अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर बंडखोरी केली जात आहे. सर्वच राजकीय पक्षांमध्ये अशाप्रकारचे चित्र पाहायला मिळत आहे. तरीही पक्षांकडून बंडोबांना थंड करण्यासाठी प्रयत्नांची परिकाष्ठा केली जात आहे. ठाकरे बंधूं देखील जीवाचे रान करून निवडणुकीला सामोरे जात आहे. मात्र, काही ठिकाणी ठाकरे बंधूंना देखील धक्क बसले आहेत. आता आजच्या अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी राज ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या एक दोन नव्हे तर तब्बल ११ पदाधिकाऱ्यांनी मनसेला सोडचिठ्ठी देत भाजपात प्रवेश केला आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी मुंबई महापालिकेसाठी युती केली. या युतीत राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला ५३ जागा सोडण्यात आल्या. बऱ्याच वाटाघाटीनंतर जागावाटप अंतिम करण्यात आले. जागावाटप फायनल करण्यासाठी दोन्ही बाजूच्या पक्षांतील प्रमुख नेत्यांचा बैठकींचा सिलसिला सुरू होता. अशातच आजच्या दिवशी मुंबईतील प्रभाग क्रमांक 97 आणि 98 मध्ये मनसेच्या 11 पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत. नेमकं कारण काय ? ज्या पदाधिकाऱ्यांनी राज ठाकरे यांची साथ सोडली आहे ते सर्वच पदाधिकारी मनसेच्या स्थापनेपासून पक्षासोबत काम करत होते. मशाल चिन्हावर उमेदवारी दिल्याने मनसेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी होती. तर मनसेकडून देण्यात आलेल्या उमेदवारीला विरोध करण्यात आला होता. या नाराजांना गळाला लावण्यात भाजपला यश आले असून, भाजप नेते आशिष शेलार यांच्या उपस्थित मनसेच्या जुन्या नेत्यांने भाजपात प्रवेश केला आहे. मनसेला वॉर्ड क्रमांक 97 मध्ये हा धक्का बसला आहे. निवडणुकीसाठी अवघे काही दिवस शिल्लक असताना जुन्या सहकाऱ्यांनी राज ठाकरेंची साथ सोडल्याने राजकीय समीकरणे बदलणार आहेत. भाजपकडून वॉर्ड क्रमांक 97 मधून हेतल गाला रिगंणात आहेत तर बाळा चव्हाण मशाल चिन्हावर निवडणूक लढवणार आहेत. प्रभाग 98 मधून दीप्ती काते यांना तिकीट देण्यात आले असून, त्यांच्या उमेदवारीला मोठा विरोध झाला आहे. हेही वाचा : शाहरुख खानविरोधात संतापाची लाट; गद्दार म्हणत देशाबाहेर हाकलण्याची होतेयं मागणी